प्रस्तावना:-
एक लेख लिहिला.
तालुक्याचा जिव्हाळ्याचा विषय म्हणून अनेक प्रतिक्रिया आल्या. कुणी राग व्यक्त केला तरं कुणी हळहळ. त्यातून अनेकांनी आठवणींना उजाळा दिला तर काहींना आपल्या या भूतकाळाची बोच मनात टोचून राहिली.
त्यातून दुसरा लेख लिहिला.
लोकं भावनिक झालीत. मग सावरली. म्हणाली, जे झालं ते वाईटच, पण काहीतरी करायला हवं.
मग अनेक प्रश्न उपस्थित झाले.
का करायला हवं? कुणी करायला हवं?
मग, आज हा अंतिम भाग लिहिला.
गावी अधून मधून येतंच असतो. सध्या करोना चा काळ, म्हणून इथलं वास्तव्य वाढलं. वेळ सत्कारणी लावावा म्हणून भटकंती. गावातल्या दुकानात जशी मंडळी भेटली तशी शेता खेताच्या बांधावर. सध्या पेरणीचा मोसम म्हणून बळीराजा कुटुंबासह रानातच भेटला. बाकी मंडळी सोशल मीडियाच्या माध्यमातून नेहमीच जवळ आहेत. त्यांचे ही विचार कळले. त्यातून हे लिखाण घडून आलं.
निचरा झाला म्हणून समाधान मानायच की इतक्या वर्षात काहीच कसं झालं नाही याची खंत!
पण असो, हे चालतच राहणार. तिघीही लेख एकत्र वाचता यावेत म्हणून हा खटाटोप.
कुणीतरी म्हटलंय, लोकशाही टिकवायची असेल तर समाजातील विचारी घटकांनी व्यक्त व्हायला हवं. समाजाला दिशा मिळाली तर उत्तमच पण किमान सत्य परिस्थितीची जाणीव व्हावी इतकीच अपेक्षा.
वाचकांचे आभार.
( या आधीच्या लेखांना फेसबुकवर जॉईन असलेल्या अनेकांच्या प्रतिक्रिया आल्यात. नाव नसल्यामुळे व्हॉटसअप वर मात्र अनेकांची अडचण झाली. त्यामुळे या लेखात नाव आणि नंबर देतोय. प्रतिक्रियेसाठी आपण मेसेज करू शकता. आपला अभिप्राय मोलाचा आहे. धन्यवाद.)
अंतिम भाग - पांझरा कान सहकारी साखर कारखाना - एक निद्रिस्त काळपुरुष
शालेय शिक्षण पूर्ण झालं तसं साक्री सोडलं. ते सोडावच लागणार होतं. त्याशिवाय पर्यायच न्हवता. गेली वीस- बावीस वर्ष अनेक शहरात राहिलो. कधी शिक्षणासाठी तर कधी कामासाठी भटकंती चालूच आहे. अनेक जवळचे, दूरचे प्रांत बघितले. कित्येक देशांना, तेथील शहर आणि गावांना भेटी दिल्या पण साक्री मात्र डोक्यातून जात नाही.
आता गावं बदललं, जागा बदलल्या आणि माणसंही बदललीत. तरीही सुट्टी मिळाली की गावी येण्याची ओढ कायम असते.
साक्री शहराची अगदी मध्यवर्ती जागा म्हणजे लक्ष्मी रोड. एस जी साक्रीवाला, ओम शांती, होम गार्ड ऑफिस, दिना स्टोअर्स, जिथं आम्हीं राहायचो तो राजवाडा आणि तिथला तो मध्यवर्ती चौक. त्यामुळे त्या काळात तालुक्यातील कुठल्याही घडलेल्या महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार!
त्यावेळचा इथला ' चार्म ' वेगळा होता. ती खऱ्या अर्थाने तालुक्याची मध्यवर्ती जागा होती.
1990 ते 99 या दशकात साक्री तालुका देखील बऱ्यापैकी चळवळ्या होता. देशाचा विचार करता, एक तालुका म्हणजे अगदीच छोटा प्रांत. पण देशभरात ज्या महत्वपूर्ण घडामोडी होत होत्या त्याचे पडसाद मात्र निश्चितच साक्रीतही दिसून यायचे.
"कसम राम की खाते हैं, मंदिर वहीं बनाएंगे ", म्हणणाऱ्या अडवाणींच्या देशपातळीवरील चळवळीची अगदी छोटी का होईना झलक इथं होती.
हातात लाल बावटा आणि छातीवर लाल बिल्ला टोचून शरद जोशींच्या शेतकरी चळवळीच्या आंदोलनाची ठिणगी तिथं पेटताना मी बघितली आहे.
राज्यातील कॉंग्रेस सरकारच्या जवळपास तीस वर्ष चालेल्या सरकारची सद्दी संपवून बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेना भाजपच्या युती सरकारच्या रुपात पहिल्यांदाच झालेला बदलाव आणि त्या पाठोपाठ गल्ली गल्लीत त्यांचे लागलेले पोस्टर्स आणि त्या खाली लिहिलेलं 'गर्व से कहो हम हिंदू है', चे घोषवाक्य मला आजही त्यावेळच्या किराणा दुकानात कुठल्या भागात चिटकवलेले होते हे सांगता येईल.
कुडकुडणाऱ्या थंडीत, सव्वीस जानेवारी किंवा पंधरा ऑगस्टला पहाटे, माध्यमिक शाळांच्या प्रभात फेऱ्या आणि त्यात मनापासून, "भारत माता की जय" म्हणणारे विद्यार्थी, शिक्षक आणि गावकरी आजही आठवले की अंगावर काटा उभा राहतो.
उसाला भाव मिळालाच पाहिजे म्हणून पोट तिडकीने ओरडणाऱ्या शेतकऱ्यांचा लांबच लांब मोर्चा...
कारखान्याच्या कामगारांचे शेतकी संघाच्या पटांगणावर होणारे उत्स्फूर्त मेळावे. त्यात त्या काळच्या तडफदार कामगार नेत्यांची भाषणे.
ताठ कण्याचे, प्रसंगी संस्था चालकांबद्दल देखील उघड बोलणारे, खऱ्या अर्थाने असलेले 'आदर्श शिक्षक' असोत किंवा आपण शेतकरी आहोत हे अभिमानाने सांगणारे तालुक्यातील मान्यवर शेतकरी. प्रत्येकाचा वावर हा असा ठाशीव आणि रुबाबदार होता.
पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर गांधी टोपी, एका हातात धोतराची कास तरं दुसऱ्या हातात काठी, पायात कोल्हापुरी वहाणा किंवा कासाऱ्याच्या मोची वाड्यातून बांधून घेतलेले बूट... अश्या रुबाबदार अवतारात वावरणारे म्हसदी, कासारे, मालपूर, धमणार, दहिवेल, पिंपळनेर, छडवेल कोरडे, निजामपूर, भाडणे, दारखेल, छाईल किंवा वसमार चे प्रगत शेतकरी. जे तालुक्याच्या गावी देखील आपली आब राखून होते. त्यात काही ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिकही होते. त्यावेळी खऱ्या अर्थाने ' शेतकरी राजा' या शब्दाला अर्थ होता. आत्तासारखी, ज्यांच कुठेच काही झालं नाही म्हणून, आमचा पुतण्या शेती करतो अशी व्याख्या नव्हती!
पांडुरंग शास्त्री आठवलेंची ' स्वाध्याय ' ही आध्यात्मिक चळवळ असेल किंवा दाभोळकरांची 'अंधश्रद्धा निर्मूलन' जनजागृती मोहीम.
यदुनाथ थत्ते यांची 'राष्ट्र सेवा दल' चळवळ,
साने गुरुजींच्या विचारांनी प्रेरित 'अंतर भारती' शिबिर असू देत की, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचे व्याख्यान प्रत्येक ठिकाणी साक्रीकरांची गर्दी व्हायची.
आम्हीं लहान होतो, फार कळायचं नाही पण या गर्दीचा भाग होऊन जे कानावर पडायचं, डोळ्यांना दिसायचं, त्यानी आमचा पिंड घडत गेला.
ज्याला आजच्या भाषेत आपण ' इनडायरेक्ट इफेक्ट ' असं म्हणतो!
हा 'इनडायरेक्ट इफेक्ट' जसा संस्काराचा असतो तसाच इकॉनोमी चा देखील असतो.
एखादा उद्योग व्यवसाय जेंव्हा तालुक्यात उभा राहतो तेंव्हा अनेकांना नोकऱ्या मिळतात. त्यावर त्या नोकरदाराचे अख्खे कुटुंब पोसले जाते, शेतकऱ्यांचा कच्चा माल आकर्षक किंमतीत विकला जातो. हे झाले डायरेक्ट फायदे.
पण इनडायरेक्ट फायदे देखील अनेक असतात. जे आपल्याला सहज दिसत नाहीत.
मागचे लेख वाचून असंख्य प्रतिक्रिया आल्या होत्या. त्यातील एक, आमच्या छडवेल पखरूणच्या मित्राची होती. पांझरा कान कारखाना चालू होता त्यावेळी त्यांची छडवेल फाट्यावर एक छोटी किराणा टपरी होती ज्यातून सुरत कडून येणारे ऊस तोडणी मजूर खरेदी करायचे. दुकान छोटे होते पण शेतीला जोडून असलेले ते त्यांचे महत्वाचे उत्पन्न होते. पण जिथं कारखानाच बंद पडला तिथं या बिचाऱ्या छोट्या टपरीची आणि त्यावर चालणाऱ्या कुटुंबाची दखल कोण घेतय?
अशी अनेक उदाहरणे आहेत. प्रत्येकाची कहाणी इथं लिहिणं शक्य नाही पण वरील प्रतिक्रिया प्रातिनिधिक होती.
परवा आमच्या शाळेचे माजी मुख्याध्यापक भेटले. त्यांनीही लेख वाचला होता. म्हणाले, मला ही कारखान्याच्या नोकरीची संधी मिळाली होती. पण त्यावेळी मी छडवेल कोरडेला उपशिक्षक म्हणून रुजू झालो होतो. कारखान्याचा पगार अनेक पटींनी जास्त होता म्हणून मला ती नोकरी करायची होती. पण खूपच विचार करत राहिल्यामुळे हातची संधी गेली आणि ती नोकरी हुकली.
साक्रीच्या बाजारपेठेत दुकान असलेला एक व्यापारी मित्र म्हणाला, तालुक्यातील विविध शाळांमध्ये शिकवणारे शिक्षक - शिक्षिका, थोडे इतर सरकारी आणि बैंक वैगेरेचे कर्मचारी हे आमचे प्रमुख कस्टमर. बाकी शेतकरी जीवनावश्यक वस्तूंच्या पलीकडे जात नाहीत. त्यामुळे सध्या फक्त या पगारदार मंडळींमुळे तालुक्याची अर्थव्यवस्था चालू आहे असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही!
खरंतर, आज संपूर्ण साक्रीची बाजारपेठ चालवण्यात 80 टक्के हाथ शिक्षकांच्या पगाराचा आहे आणि एक माजी शिक्षक कारखान्याच्या नोकरी बद्दल असं बोलत होते. यावरून त्यावेळचा कारखाना आणि त्यातून निर्माण होणाऱ्या रोजगाराचे महत्त्व लक्षात येईल.
गेल्या पंधरा सोळा वर्षात आठवून बघा, आपल्या आजूबाजूची मित्रमंडळी. कुणी इंजिनिअरिंग केलंय. कुणी BE, Diploma किंवा ITI. कुणी BSc Agri, किंवा शेतकी. Pharmacy, MBA झालेली ही अनेक मंडळी आहेत. त्यांपैकी किती लोकं तालुक्यात कामाला आहेत? बोटांवर मोजण्या इतके किंबहुना त्याहून कमी!
कारण, त्यांच्या शिक्षणाला साजेस कामच इथे नाही.
BEd, DEd, BPhEd ची तर फौज आहे.
त्यातील ज्यांच्या ओळखी होत्या, संस्था चालकांना वीस पंचवीस लाख देण्याची तयारी होती, अशांना नोकऱ्या मिळाल्या. बाकी बिचारे मात्र शेताच्या बांधावर बसून आपण खरंच इतकं शिकायला हवं होतं का? हा विचार करत बसलेत.
एखाद्या संध्याकाळी, कासाऱ्याच्या समर्थ मंदिराकडचा रस्ता, म्हसदीचा धमनार रोड किंवा साक्री चा पेरेजपूर्, आंबापुर रस्ता... अश्या कुठल्याही ठिकाणी जा, तिथं रिटायर्ड मंडळी भेटतील. तुम्ही विचारले नाही तरी ते स्वतःच आपला मुलगा मुंबई, पुण्यात कसा पन्नास हजार महिना कमावतो, स्वतःच फ्लॅट घेऊन पंधराव्या माळ्यावर राहतो, कुणाच्या अध्यात ना मध्यात राहता कसा कंपनीच्या गाडीत ऐटीत प्रवास करतो, असल्या फुशारक्या मारतांना दिसतील.
पण त्याचवेळी तो मुलगा बिचारा दोन-दोन तास शहरातील ट्रॅफिकमध्ये अडकून पडत असेल, लोकलच्या गर्दीत गुदमरून जात असेल... वनबीएचके चा ई.एम.आय. भरता भरता आपले अख्खे तारुण्य वाया गेले असा विचार करत असेल...
गावात आल्यावर, शेजार पाजाऱ्यांसमोर बापानी इतकं कौतुक करून ठेवलं असेल की ते पोरगं गुपचूप परत शहरात मिळेल ती नोकरी करत बापाच्या फुशारकीला जपत गपगुमान जगत असेल.
सोशल मीडियाच्या दुनियेत जसं एक आभासी विश्व असतं. जिथं फक्तं आनंदी फोटोंमध्ये, आनंदी चेहरे असतात... तशीच काहीशी ही 'आभासी प्रगती' म्हणता येईल!
फार पूर्वी पुण्याच्या निसर्गरम्य आणि शांत वातावरणामुळे त्यास रिटायर्ड लोकांचे शहर म्हणायचे. आता तसंच साक्रीला देखील म्हणायला हवं.
' रिटायर्ड लोकांचा तालुका' !
कारण, इथं फक्तं म्हातारे मायबाप किंवा शाळकरी वयातील मुलं राहतात. काम करणारी, कमावती तरुण पोरे मात्र सूरत, बडोदा, मुंबई, पुणे नाशिक... वाट मिळेल तिकडे...
कारण, आपल्या तालुक्यातच राहण्याची इच्छा असूनही त्यांना संधी कुठे आहे?
इथं पूर्वी सारखी ना कुठली चळवळ शिल्लक राहिली आहे ना कुठले आंदोलन. एकमेव उद्योग होता तोही बंद.
दुसरं नोकरी मिळू शकेल असं कुठलच साधन नाही.
नाही म्हणायला, इथलं भौगोलिक महत्व जाणून,
' सुजलॉनची ' विंडमील आणि ' गेल ' चे सोलार पॅनल आलेत. पण तिथल्या पेक्षा कुठल्यातरी स्मशानभूमीत जास्त कर्मचारी कामे करत असावेत अशी परिस्थिती!
गावे ओस पडलीत. पर्याय नाही म्हणून शेती. काही अपवाद आहेत, जोड धंद्यातून प्रगती करणारे. पण त्यांनाही फार पर्याय नाहीत. त्यातला एक होतकरू मित्र म्हणाला,
गेल्या वर्षी कधी न्हवे इतका पाऊस झाला. पांझरा, कान जामकी, तालुक्यातील होते नव्हते ते ओढे नदी-नाले सर्वच ओसंडून वाहत होते. विहिरी भरल्या. उसाची आठवण आली.
म्हणाला, दहा एकर क्षेत्रात एकच मोठं पिकं घेतलं तर मेंटेनन्स ला सोपं जातं. आपला कारखाना बंद म्हणून,
' द्वारकाधीश ', ला नंबर लाऊन पाहिला. पण त्यांच्याच परिसरातील अनेक नंबर्स होते. ते साक्री तालुक्याला कसे प्राधान्य देतील. काहींना बिवारे मिळालं ही. आम्हाला मात्र नाही. म्हणून, कांदा लावला. पिक जोरदार झालं. त्यामुळे साठवून ठेवला. आता करोना आला. विक्री नाही म्हणून अर्धा सडून जातो की काय ही भीती आहेच.
दुसरा म्हणाला, जोड धंदा म्हणून म्हशी घेतल्यात. साक्रीला जाऊन सर्व दूध विकणे परवडत नाही. विकलेही जात नाही. शहरात साठ सत्तरचा भाव मिळतो, गावात चाळीस पंचेचाळीसला सोडून द्यावं लागत.
पूर्वी एक भाऊ, साक्रीत नोकरीला तर दुसरा गावी शेतीत, अशी रचना होती. नोकरी करणारा किराणा बघायचा तर शेतीवाला अन्नधान्य. त्यामुळे त्या कुटुंबाचा बॅलेन्स होऊन जायचा.
पण आता परिस्थिती बदलली. नोकरी करणाऱ्याची मुलं शहरात वनबीएचके च्या चक्कर मध्ये अडकलीत तर गाववाल्यांची मातीच्या छपराच्या डागडूजीत!
नव्वदच्या काळातील साक्रीच्या, शेतकी संघात ऐटीत वावरणारा शेतकरीच काय तरं ' शेतकी संघ' देखील नामशेष झालाय. ना कामगारांचे अस्तित्व आहे ना शेतकऱ्यांचे. त्यामुळे, कुठली आलीत आंदोलनं नी कुठली आलीय चळवळ? म्हणून मग शेतकी संघाच्या पटांगणाचा देखील काय उपयोग? टाकलीत तिथं दुकाने बांधून!
हा देखील एक, ' इनडायरेक्ट इफेक्ट ' बरं का!
महाराष्ट्रातील, ' लातूर ' हा असा तालुका आहे जिथं उन्हाळ्यात पिण्याचे पाणी देखील मिळत नाही. टँकरच काय तर पिण्याच्या पाण्याची रेल्वे तिथे पोहचवावी लागते. तरीही तिथं साखर कारखाना आहे. MIDC आहे. थ्री स्टार हॉटेल्स आहेत, अहो, थियेटर, मल्टिप्लेक्स देखील आहेत... कारण इच्छाशक्ती आहे.
तरीही, मराठवाडा किंवा विदर्भाचं समजू शकतो. तिथल्या काही तालुक्यात खरंच निसर्गाने अवकृपा केलीय. पाणी नाही. जमिनी नापीक आहेत.
पण आपल्याकडे तर सर्वच आहे. सुपीक जमीन, मुबलक पाणी, तरीही...
' झुंज ', नावाचा एक जुना मराठी सिनेमा होता. त्यात तमाशातील एका गाण्यात सवाल-जवाब आहे. त्याच्या ओळी पूर्वीच्या आणि आत्ताच्या साक्री तालुक्याच्या परिस्थितीला अगदीं चपखल बसतात...
कोण होतास तू, काय झालास तू
अरे वेड्या कसा वाया गेलास तू...
एकोणिसाव्या शतकाच्या सुरुवातीला टायटॅनिक नावाचं अतिप्रचंड ब्रिटिश जहाज पाण्याखाली बुडालं. त्यात अनेक लोकं मेली. अजूनही अधून मधून संशोधक पाण्याखाली उतरून त्या जहाजेत कसला कसला शोध घेत असतात.
आज बावीस वर्ष झालीत, पांझरा-कान बंद आहे. उद्या महाराष्ट्राच्या सहकार चळवळीच असच संशोधन करायचं झालं तरं संशोधकांना अजून काही वर्षांनी इथला पत्रा तरी सापडेल काय याची शंका वाटते!
त्यामुळे एक शेवटचा प्रयत्न म्हणून हे प्रकरण समजून घ्यायला हवं.
कुणीतरी मित्राने मागच्या लेखावर कमेंट केली, आता तालुक्यातील तरुणांनी पुढे यायला हवे.
म्हणजे, गेल्या बावीस वर्षात तालुक्यात मुलं तरुण झालीच नाहीत काय...?
दुसऱ्या एका नी सांगितलं, तरुणांनी पेटून उठाव करायला हवा..
मी म्हटलं, कुणाविरुद्ध आणि कसा?
एका महाशयांनी तर चक्क कैलासवासी झालेल्या जुन्या पुढाऱ्यांना खेचून आणून जाब विचारायला हवा असं मत मांडलं.
या सर्वांच्या भावना आपण समजू शकतो. या प्रतिक्रियांमागे फक्त तालुक्याचे कल्याण व्हावे. इथं एक सक्षम उद्योग उभा रहावा इतकीच सर्वांची इच्छा आहे. अपेक्षा मात्र फक्त राजकारण्यांकडून आहेत. आणि इथेच गल्लत होतेय असं वाटतं. जिथं फायदा नाही तिथं अहो, राजकारणी तरी कसे हाथ टाकतील.
अगदी स्पष्टच सांगतो-
तालुक्याचे भूमिपुत्र आणि देशाच्या राजकारणात अत्यंत मानाचं पद भूषवलेले माननीय माजी मंत्री साहेबांनी ज्यावेळी गेल्या टर्मला शपथ घेतली त्यावेळी तालुक्याच्या सुकलेल्या वृक्षालाही आशेची पालवी फुटायला लागली होती. त्यात चूक काही नव्हतं. पाऊस पडला की दोन थेंब आपल्यावरही पडावेत अशी अपेक्षा चराचरात निर्माण होते. पण हे ढग दिवसभर आपलेच वाटत असले तरी, संध्याकाळी त्यांच्याच मतदार संघात बरसतील हा निसर्गनियम आपण विसरलो आणि भाबडी आशा लाऊन बसलो. जन्म इथे झाला म्हणून काय झालं, कार्यक्षेत्र तर दुसरं आहे हे विसरून कसं चालेल!
दुसरे कारखान्याचे शेवटचे माजी. इथल्या चिमणीच्या राखेचा टिळक ज्यांनी भाळी लाऊन आपली प्रगती करून घेतली. अनेकांच्या उध्वस्त संसाराचा घास नुसताच गिळला नाही तर पचवला देखील. त्यामुळे ते महाशय आता इतके समाधानी आहेत की पुन्हा कशाला या विस्तवावर हाथ टाकायचा, हा त्यांना पडलेला प्रश्न रास्त आहे!
तिसरे आणि शेवटचे ज्यांच्याकडून ' तरुण ' म्हणून अपेक्षा होती. पण ते विधानसभेच्या मृगजळामागे धावत बसलेत. तेही परक्या तालुक्याच्या भरवशावर... अहो, तितकीच ऊर्जा इथं लावली असती तर मंत्रालयाचं सुखं नाही पण जन्मभर पुरेल इतकं पुण्य नक्कीच कमावलं असतं तुम्ही, तालुक्याच्या आशीर्वादाने!
बाकी, वर्षभर शाल-श्रीफळ देऊन एकमेकांचा वाढदिवस करणारे आणि कॅलेंडर मध्ये दिलेल्या महापुरूषांच्या व्हॉट्स ऍप जयंत्या-पुण्यतिथ्या साजऱ्या करणाऱ्या, आपल्याच कोशात राहणाऱ्या भाऊ, दादा, तात्या, साहेब यांच्या कडून काय अपेक्षा करणार...?
नव्वद च्या दशकात तालुक्याने अंगार बघितला आहे. चळवळ अनुभवली आहे. त्याची पुनरावृत्ती कठीण असली तरी अशक्य नाही.
कारखान्याकडे राजकारण म्हणून नव्हे तर अनेकांच्या उपजीविकेचे साधन ठरणारा एक प्युअर उद्योग - व्यवसाय म्हणून बघायला हवं.
राजकारण विरहित. उद्योगस्नेही. माणसांच्या चांगुलपणावर विश्वास असणाऱ्या आणि दगडालाही पाझर फोडणाऱ्या वृत्तीच्या तरुण फळीची आज गरज आहे. ती कुणी राजकारणाचा वारसा नसली तरी चालेल. पण इथल्या मातीची कळकळ त्यांच्यात असायला हवी.
स्वतःच्या उच्च शिक्षणाचा, अनुभवाचा फायदा घेत
' स्वदेस ' या सिनेमातील नायकाप्रमाणे एक नाही तर दहा 'मोहन भार्गव' तालुक्यात परतायला हवेत.
वर म्हटल्या प्रमाणे इथले शिक्षित, वन बीएचके च्या ई.एम. आय. च्या चक्रव्यूह मध्ये अडकलेले. तरीही, स्वतःच्या गावाची ओढ असणारे...
आणि शेताच्या बांधावर आपल्या डिग्रीचा उपयोग काय असा विचार करणारे...
हे सर्व तरुण एकत्र आले पाहिजेत.
इथून बाराशे किलोमीटर दूर अयोध्येच्या मंदिरासाठी जर आमच्या तालुक्यातून विटा पोहचत असतील तर इथल्या अस्मितेच्या प्रश्नासाठी, अनेक कुटुंबांच्या रोजगारासाठी आणि तालुक्याच्या उन्नतीसाठी, पुन्हा एकदा का शपथ घेत नाहीत? पुन्हा एकदा का म्हणत नाही-
कसम राम की खाते हैं, मंदिर (कारखाना) वहीं बनायेंगे...
(#कातरवेळचा कोलाहल की कल्ला... काहीसं काहीतरी!)