#जगणं समजून घेतांना
नाव: गोदू सीताराम बोरसे
पाऊस सुरू होऊन महिना झाला आता. कमी-अधिक प्रमाणात तो सर्वीकडे पडतोय, बऱ्यापैकी हिरवळ झाली आहे. तुम्ही बाहेर पडलात आणि आजूबाजूला बघितलं तर अनेक डोंगररांगा, माळरानं हिरवीगार झालेली दिसतील. त्यातील एक हमखास दृश्य म्हणजे त्या उंच डोंगरावर चरणाऱ्या शेळ्या, मेंढ्यांचा मोठाच मोठा कळप आणि त्यांच्या मागे हातात काठी घेऊन एखाद्या दगडावर बसलेला मेंढपाळ.
आपल्याला नेहमीच तो दुरून बघण्याची सवय. फार फार तर कधी हायवेला नाहीतर गावाकडच्या एखाद्या वाटेवर मध्येच हा कळप आडवा जातांना दिसतो. बंदिस्त कारमध्ये बसून मग जोरात हॉर्न वाजवला जातो. बाईक असेल तर हॉर्न सोबत एक्सलेटर ही पिळल जातं, जेणेकरून त्या आवाजाने घाबरून, झटक्यात त्या मेंढरारांनी आपल्याला वाट द्यावी, इतकंच त्यांचं अस्तित्व असतं आपल्यासाठी.
परवा अश्याच एका डोंगरावर भटकताना या गोदू मेंढपाळाची भेट झाली आणि मग काही काळ गप्पा. तसं, या लोकांना बोलतं करणं महाकठीण. पण गोदू बराच बोलका वाटला. कदाचित दुपारच्या टळटळीत उन्हात निर्मनुष्य डोंगरावर त्या मेंढरांच्या आणि त्याच्या व्यतिरिक्त अजूनही कुणी आहे ही भावना त्याच्यासाठी सुखावणारी असेल. त्याच्या हसऱ्या चेहऱ्याकडे बघून तरी तसं वाटलं. पन्नाशीकडे झुकणार वय. खुरटी दाढी. डोक्यावर लाल पटका. गोदू म्हणाला गेली पंचवीस-तीस वर्ष तो हे काम करतोय. जवळपास शंभर च्या आसपास मेंढर. त्यांना दररोज असं माळरानावर न्यायचं. ही जनावरं हुशार असतात. कळपात राहतात. शिस्तीत चरतात. एखादं दुसरं असतं आगाऊ म्हणून लक्ष द्यावं लागतं इतकच. गोदू च्या म्हण्याप्रमाने शेळी आणि मेंढी एकत्र फार खुशीन राहत नाहीत. त्यामुळे त्याच्याकडे, फक्त मेंढरच आहेत.
आम्ही बसलो होतो तिथून बरोबर समोरच्या डोंगरावर ती मेंढर चरत होती आणि गोदू इतक्या दुरून त्यांच्यावर लक्ष ठेऊन होता. माझ्या मनात विचार आला, ही माणसं असं एकटं बसून दिवसभर काय विचार करत असतील. त्यांच्या मनातही भविष्याची स्वप्न असतील का? येणाऱ्या काळासाठी ते देखील आपल्याच सारखी तजवीज करण्यासाठी धडपडत असतील का? कधी नैराश्य त्यांच्या वाटी आलं तर ते त्याचा सामना कसा करत असतील? शहरात- गावात घर बांधून राहणाऱ्या सुरक्षित- सुशिक्षित समाजाबद्दल त्यांच्या मनात सुप्त असूया असेल का? त्यांच्या कळपासमोरून भरगाव वेगाने जाणाऱ्या तरुणांच्या मोटारसायकल बघून त्यांच्या मुलांना काय वाटतं असेल?
गोदू म्हणाला, पावसाळ्याची चार पाच महिने बरी जातात. चारा भरपूर मिळतो. पण त्या नंतर मात्र भटकंती सुरू होते. वाट मिळेल तीकडे. दूर च्या प्रांतात. कधी गुजरातच्या सोनगड, व्यारा, सुरत च्या दिशेनी तर कधी मध्य प्रदेशातील खेतिया, देवास, खंडवाकडे. नाहीतर महाराष्ट्रातीलच जवळपासच्या जिल्ह्यात. सोबत त्यांच्या प्रमाणेच एक किंवा दोन कुटुंब. कधी बैलगाडी कधी पायी, सोबत चालती मेंढर. सहा सात महिन्यात ती मोठी होतात. मग त्यातीलच काही विकली जातात तर काही नवीन जन्माला येत राहतात. त्यामुळे कळपाची संख्या मेन्टेन रहाते.
गेलं वर्ष मात्र खूप कठीण होतं म्हणाला, कुठला तरी आजार आला आणि अनेक मेंढर अचानक तोंडात फेस येऊन जागीच मरायला लागली. खंडीभर (वीस) मेंढरात तीन-चार रोज मरायची म्हणाला. काही कळपात तर सकाळी मेंढरांना घेऊन जाणारा मेंढपाळ संध्याकाळी फक्त हातात काठी आणि डोळ्यात पाणी घेऊन परतायचा.
शासनाकडून काही अनुदान किंवा भरपाई मिळते का विचारले तर गडी हिरमुसला. म्हणाला काहीतरी योजनाबिजना आहेत पण आम्हाला त्या फार समजत नाही. मेडिकल स्टोअर्स मध्ये औषध मिळतात ती यांना देतो. कधीतरी गावात व्हेटर्नरी डॉक्टर येतो. त्याची मदत मिळते पण बराच काळ तर आम्हीं परक्या मुलुखात हिंडत असतो.
एखादा शेतकरी शेतात मेंढी बसवण्याचे दिवसा प्रमाणे पैसे देतो. आठ नऊ दिवस मग आम्ही त्या एकाच ठिकाणी पाल ठोकून राहतो. शेतकऱ्याला खत मिळतं, आम्हाला जागा आणि मिठमिरचीला पैसा. उन्हाळ्यात मात्र कांदा, मका सारखी पिकं काढून झाल्यावर उरलेला पाला पाचोळा खाण्यासाठी शेतकऱ्यांना पैसा द्यावा लागतो.
माळरानावर पाल ठोकून राहताना भीती वाटत नाही का? या माझ्या प्रश्नावर मात्र त्याला हसू आलं.
अनेक वर्ष आम्ही असेच जगतो. चोरण्यासाठी आमच्याकडे काहीच नाही, त्यामुळे चोराबिरांची भीती वाटतं नाही. फक्त कधी कुठे बिबट्या किंवा इतर जंगली जनावर आले की काळजी घ्यावी लागते. रात्री आम्ही आलटून पालटून जागतो, झोपतो.
बऱ्याचदा एखाद्या शेतात चुकून मेंढर घुसली तर शिव्या खाव्या लागतात, प्रसंगी मारही बसतो. पण आम्ही कधीच काही बोलत नाही. बोलून आपलंच नुकसान होतं, आपण परक्या मुलखात असतो म्हणून गुमान ऐकून घ्यावं लागतं.
आमची मुलं या मेंढरात वाढतात त्यांच्यातीलच एक होऊन जातात. त्यांना जीव लावतात. जमलंच तर शाळेत जातात नाहीतर दिवसभर या कळपामागे. वर्षाकाठी शंभर मेंढी असलेला मेंढपाळ दीड ते दोन लाख रुपये कमावतो. त्यात त्याच्यासोबत त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो.
...................
...................
इथून पुढे, त्या मेंढपाळाचे जगणे, त्याचे उत्पन्न, त्याचे तुमच्या जीवनाशी, तुमच्या पगाराशी तुलना...मग तुमचं सुंदर जीवन, समाधान वगैरे गोष्टी मी इथं लिहीत नाही कारण त्या व्हाट्सअप विद्यापीठात आपण रोजचं वाचत असतो आणि तरीही आपल्याला हवं तसंच जगत असतो. त्यामुळे ते लिहिण्याला आता अर्थ नाही!
आपल्याकडे, ' जिप्सी ' या नावानी खूप साऱ्या कविता, ललित लिहिलं जातं. तिथे त्या साहित्यिकांना जिप्सी या शब्दाचा ' भटक्या ' हा अर्थ अभिप्रेत असतो.
या जिप्सी चा मात्र सध्या ट्रेंड आहे. आपल्या प्रोफाईल वर तो ऍड करून ग्लॅमर वाढवता येतं, असा समज!
एखादा अनेक नोकऱ्या बदलत असतो म्हणून स्वतःला जिप्सी म्हणतो तरं दुसरा वेगवेगळ्या गावातील त्याच्या रहिवासाला. एखादा कॉर्पोरेट क्षेत्रातील बिगी देखिल आपल्या नेहमीच्या फॉरेन टूर्स मुळे ट्विटर हॅण्डल वर स्वतःला 'कॉर्पोरेट जिप्सी', म्हणून डिफाइन करतो, तर एखादा ' हरले ' किंवा ' एनफिल्ड ' वाला हौशी एलिट प्रवासवीर (मराठीत कुल ट्रॅव्हलर) इंस्टा वर स्वतःला जिप्सी म्हणवून घेतो.
त्यावेळी, वाटतं वर्षातील सहा सात महिने आपल्या लेकराबाळांना घेऊन मेंढरांचा कळप आणि त्याला सांभाळणारा तो 'रियल जिप्सी मेंढपाळ' उन्हातानात, वाऱ्या-पावसात, डोंगर दऱ्यात जेंव्हा फिरत असेल, त्याला जसं हे जगणं जाणवत असेल. ते खरोखरच सोशल मीडिया च्या जिप्सी प्रोफाईल इतकं कुल असेल का? ग्लॅमरस असेल का?
#जगणं समजून घेतांना
( ' गंध ' ही भूतकाळातील अनुभवांवर आधारित 'नॉस्टॅल्जिक सिरीज', आणि
'कातरवेळ चा कोलाहल की कल्ला' ही सभोवतालच्या जागा, परिस्थिती, घटनांवर आधारित लेखमाला लिहितोच आहे.
सोबत, ' जगणं समजून घेतांना' ही मला भेटलेल्या, भेटत राहणाऱ्या, आडवाटेवरच्या माणसांची गोष्ट ही लिहिण्याचा प्रयत्न करणार आहे. त्यातील हा पहिला लेख)
No comments:
Post a Comment