अज्ञाताची ओढ
पहाटेच धुकं... अभ्र, कुंद आकाश
थंड बोचऱ्या संध्याकाळी...
अडकून राहिलेलं काही...
कितीतरी दिवस, कदाचित खूप वर्ष.
पूर्ण होण्याची इच्छा नाही आता...
बस्स, ते तसचं टिकून रहावं इतकचं
वय सरत तसं, निसटून जातं बरचसं...
काही नैसर्गिक,
काही परिस्थिती मुळे
तर काही सोडून देतो, आपणच
शरीर आणि मन
ऍडजस्ट करत राहतात,
जुळवून घेतात...जुळवावाच लागतं
जगणं असचं असतं
मागे उरतात अडकून राहिलेले,
शब्द, आवाज, स्पर्श तर कधी फक्त गंध
आठवणींचा कोलाज बनतो
दिवसाच्या कुठल्या तरी आवडत्या प्रहरात
हा कोलाज मग उडत राहतो...
खास करून चाहूल लागणाऱ्या दिवसात
त्याला चाहूल खूप आवडते...
एकटा असला की माणसांची
साचून राहिला की प्रवासाची
कोरडा असला की शब्दांची
गर्मीने हैराण झाला की मृगाची चाहूल
ढगाळ पावसात गुदमरला की थंडीची चाहूल
आता थंडी पडणार म्हणून आतुर
पण या वर्षी जसा, खूप पाऊस पडूनही तो भिजलाच नाही...
थंडीत तरी हुडहुडी भरावी,
बोटे आणि हाथ आखडून जावेत
ओठ फुटून त्यातून रक्ताचे ठिपके गळावे
गाल सुजून खपले पडावेत
गारठ्याने गोठून टाकाव्यात
सर्व काळज्या, अवास्तव अपेक्षा आणि थांबलेले आजूबाजूचे जग...
संपून जावा हा काळ
उद्यासाठी, नवीन आठवणी तयार व्हाव्यात
अनेक कथा, नवीन पात्र, नवीन जगणं बघता यावं
थांबून राहण्यात अर्थ नाही,
म्हणून वाहत रहावं...
नितळ स्वच्छ होतं जावं
वाहता वाहता एक दिवस
जेथून आलो तिथं पुन्हा एकरूप व्हावं...
No comments:
Post a Comment