Sunday, 19 April 2020

स्विकार

आज पर्यंत खूप टीका केली देशावर वेळोवेळी.

खरंतर शाळेत असताना प्रचंड देशभक्ती वाटायची. स्वातंत्र्य संग्राम, आपला इतिहास, क्रांतिकारी, महापुरुष या साऱ्यां विषयी वाचले तरी आंगवर शहारे यायचे.

शाळा कॉलेज मधून बाहेर पडलो. नौकरी धंद्याला लागलो. प्रचंड स्पर्धेला सामोरे गेलो. कधी यशस्वी झालो तर कधी प्रचंड वाट लागली... हळूहळू अनुभव वाढत गेला आणि मत परिवर्तन व्हायला लागलं. खरा आणि खोटा इतिहास स्पष्ट दिसायला लागला. राजकीय आणि सामाजिक व्यवस्था कश्या पद्धतीने माहिती manipulate करते याची जाणीव झाली. अजून दृष्टिकोन विस्तारत गेला.

दरम्यान, अनेक देश बघण्याची संधी मिळाली. खास करून युरोप बघून भारावून गेलो. नकळत आपली आणि त्यांची तुलना मन करू लागलं. ते ' विकसित ' आपण मात्र कायमच कसे ' विकसनशील '...
त्यांचे रस्ते, शहरं, तेथील लाईफ स्टाईल बघून सुप्त इर्षा तयार झाली. आपल्याकडे असे का नाही म्हणून मन प्रश्न विचारायला लागलं.
पण मग आपल्या देशातील काही चांगल्या गोष्टींचा चा उदो उदो करून त्यांचं ' अमुक ' चांगलं म्हणून काय झालं आपल ' तमुक ' किती भारी आहे असा समज करून मनाचे समाधान करून घेतलं. पण म्हणतात नं, खोट्याच सोंग किती काळ घेणारं.

मुंबईतील ट्रॅफिक मध्ये फसलो, कधी कामात स्पर्धेला घाबरलो नाहीं पण त्यातील राजकारणाने वैतागलो, चांगल्या सोबतच बऱ्याच विचित्र लोकांना सामोरे गेलो. अगदी पोलीस कोर्ट कचेरी देखील केली... कधी चांगले अनुभव आले तर बऱ्याचदा वाईट. मग त्या त्या वेळी देशाबद्दल राग निर्माण व्हायला लागला. पूर्वी जपून बोलायचो पण नंतर उघडं विरोध करायला लागलो. देशातील प्रत्येक गोष्ट आवडीनाशी झाली. टीका करायला लागलो. सुरवातीला सभ्य शब्दात. नंतर, घंटा फरक पडत नाहीं या देशात... इतका प्रवास झाला!

मग पूढे पुढे त्याचाही त्रास व्हायला लागला. आपल्या हातात काहीच नाही मग उगीच कशाला त्रास करून घ्यावा असा पक्का समज करून घेतला. त्यामुळे भोसड्यात गेलं सर्व असं म्हणून तटस्थ झालो. बधीर करून घेतलं स्वतःला.

पण आजच हे सर्व सांगण्याचा हेतू हा की, सद्या कोरोना मुळे जगातील प्रगत राष्ट्र देखील जिथे हतबल झालेत तिथे आपला दीडशे कोटी लोकसंख्या असलेला,
जाती धर्माची विचित्र गुंतागुंत असलेला,
भाषा, प्रांत, मान्यता सर्वच बाबतीत विविधता असलेला...
अत्यंत तुटपुंजे रिसोर्सेस, निधी चा अभाव, टेक्नॉलॉजी ची कमतरता...

असलेला आपला देश ज्या धीराने या संकटाला सामोरे जातोय. ते खरंच कौतुकास्पद आहे. इतरांच्या तुलनेत अजूनही आपण बऱ्यापैकी कंट्रोल स्थितीत आहोत. आपले पोलीस, डॉक्टर्स आणि इतर सर्व अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या यंत्रणा ज्या पद्धतीने काम करतायत ते अवर्णनीय आहे.
उदारहण म्हणून फक्तं कल्पना करा, मुंबई सारख्या शहराला अश्या परिस्थितीती होणारा पाणीपुरठा, गॅस, जीवनावश्यक वस्तू, भाजीपाला, दूध... सोबत दवाखाना. खूप कठीण आहे हे. पण अजूनही सुरळीत चालू आहे सर्व.

काल वाचनात आले की अमेरिकेने त्यांच्या देशात बाहेरून आलेल्या विद्यार्थ्यांना मिळणारी स्कॉलरशिप रद्द केलीय, स्टूडेंट लोन बंद केलय. H1B वाल्यांना सहा महिन्याची नवीन नौकरीची मुदत दिली आहे.
कमाल आहे. संकट नक्कीच मोठं आहे पण त्याला सामोरं न जाता लगेच आपल-तुपल करायला लागलीत ती लोकं...

आणि माझा देश, आधीच दीडशे कोटींच्या आसपास. तरीही जगातील कुठल्याही भारतीयांना नागरिकत्व देण्याची तयारी दाखवतो. किती विशाल हृदय असावं लागतं याला...

नेहमी म्हणायचो, " आपल काय, आपला देश तर भगवान भरोसे..." यात श्रद्धा पेक्षा उपरोधित स्वरच अधिक असायचा.

पण आज सपशेल माघार. कल्पना आहे करोना चे संकट अधिक भयंकर आहे. अजूनही सर्व चाचण्या व्हायच्या आहेत. आकडा वाढू ही शकतो. पण जे होणारं असेल ते होईलच. पण ज्या पद्धतीने आपली लोकं आणि सर्वच प्रशासन कामं करतायत ते अभिमानास्पद आहे. कुणीतरी आहे हा विश्वास नागरिकांत निर्माण करणे ही काय छोटी गोष्ट नाहीं. इथून पुढे देशाला आणि पर्यायाने इथे जन्माला आलो म्हणून स्वतः च्या नशिबाला कोसने बंद!

1 comment: