Sunday, 19 April 2020

कासारे (आत्याच गावं)

कासारे:-

वस्तू, जागा, घर, इतकंच काय तर अंगावरच्या कपड्यांपासून तर पायातल्या चपलांपर्यंत मनुष्य सर्व काही इथेच सोडून जातो. मागे राहतात त्या फक्त आठवणी.

दोन वर्षांपूर्वी बायजा गेली मग मागे आण्णा... परवा आक्का देखील गेली. आज तिला जाऊन पाच दिवस झालेत म्हणून दहव्याचा हा कार्यक्रम! मुंबई हून रात्री चा प्रवास करून आलो पण झोप अशी नाहीच...
बालपणीच आत्याच हे गाव सारखं डोळ्या समोर येतं होत.
कासारे म्हटल की बायजा- आक्का हे समीकरण पक्कं!  त्यांच्या शिवाय या गावात जाण्याचा तसा संबंध न्हवताच!
आणि आज त्या दोघीही इथे नाहीत... आता कासाऱ्यात कुणीच नाही, म्हणजे ही आपली इथली शेवटची भेट तरं!

मी इथे या ओट्यावर बसलोय... पलीकडच्या गल्लीत अक्काचा कार्यक्रम चालू आहे तर बाजूच्या गल्लीत बायजा चे घरं... सवयी प्रमाणे बायजा कडे जावे तरं तिथे कुणीच नसणार... भयंकर वाटतंय. इच्छा असूनही त्या गल्लीत आपण आता शिरणारच नाहीं का कधीही...

अंगावर अक्षरशः काटा येतोय... म्हणजे जीवनाचं हे देखील एक रूप असतं तरं!

आण्णा-बायजा, आप्पा-आक्का, बापू... एका गांवात राहणारी ही रक्ताची माणसं... बालपणातील एक काळ आणि असंख्य आठवणी आहेत कासाऱ्या च्या...

प्रत्येक दसऱ्याला दादांनी सकाळी मोटारसायकल धुतली की पहिली भेट साक्रीच्या गुरुदत्त मंदिरात आणि मग तिथून पुढे सरळ कासारे. मी पुढे टाकीवर तर दीदी दादांच्या मागे... असा तो प्रवास. बायजा किंवा आक्का कडे जायचे म्हटले की दादा मोटारसायकल नेहमी मागच्या दारून  घ्यायचे.
बस स्टँड वरून मागचा रस्ता सोपा पडायचा. पुन्हा वाटेत.   'दरबार बँड पार्टी '  वाल्यांची घरं नी त्या समोर ठेवलेले ढोल ताशे बघितले तरी लग्नात नाचल्याचा आनंद व्हायचा.

बायजा च्या घरी मागून पुढे जायचे म्हटले तर एक अरुंद पण लांबलचक बोळ होती. त्यातून एका वेळी एकच व्यक्ती जाऊ शकत असे. तिथून चालायला गम्मत वाटायची. पण कधी तरी समोरून बैल आला तर आमची पळता भुई व्हायची! पूर्वी बायजा च्या घरासमोर प्रचंड मोठा वाडा होता. जुन्या मराठी सिनेमात पाटलाचा वाडा असायचा तसा त्याचा फिल होता. एका बाजूला कधी कधी गुर बांधली जात तर दुसरी बाजू मोकळी. माईचा नारळाचा कार्यक्रम याचं वाड्यात झाल्याचं आठवतंय. बायजा आण्णाना नातवंड खूप. सुट्टीत ती मंडळी आली की धमाल करायची. माझ्याहून मोठे असूनही ते मला मामा म्हणायचे त्यावेळी राग यायचा. पण नंतर कळलं की वय कमी असल तरी आमच्यात मामा- भाच्याचेच नाते होते.

बायजा कडे गेलो की सर्वप्रथम खोल बशीत चिवडा आणि घट्ट दुधाचा चहा मिळायचा. ओसरीत मधोमध एक लाकडी खांब होता ज्याला पकडून सर्व भाचे मंडळी दिवसभर धावत पळत, तरं मोठी माणसं त्या खांबाला टेकून निवांत बसत.
बाजूला धान्यसाठी दोन मोठी कोठार होती. त्या कोठरांच्या खाली छोटा दरवाजा फार गंमतीशीर वाटायचा त्यावेळी.

लहानपणी आण्णांची थोडी भीती वाटायची त्यामुळे त्यांच्याशी बोलणे कमी व्हायचे पण बायजा कडे मात्र आम्ही मोकळेपणाने बोलायचो. दसऱ्याच् सोन दिलं की बायजा हातात वीस पैसे ठेवायची त्याचा खूप आनंद व्हायचा. दादा मात्र आणांसोबत नेहमी मोकळे बोलतांना दिसायचे.

बायजा कडून आक्का कडे जायला निघालो की मागच्या दारात बायजा चा जोरात आवाज येई, " जेवाले आठेच ये बरं का दादाभाऊ "
दादा बायजला हसून होकार तरं देत पण मनात आता, आक्काला काय उत्तर द्यायचे हा प्रश्न त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसे आणि मग आम्ही त्यांच्यावर हसायचो.

माई च्या लग्नानंतर तिला कासाऱ्याला घ्यायला जायचं ही माझी जबाबदारी होती. फक्तं सतरा- अठरा वर्षाची माई. म्हणायला मोठी बहीण पण लग्न झालेली सासुरवाशीण म्हणून खूप लहान!  माईला घ्यायला गेलो की तिला खूप आनंद व्हायचा. पण बायजा मात्र आम्हाला लवकर सोडतच नसे. आत्याच्याच घरी दिल्यामुळे थोड हक्कान बोलता यायचं पण त्या बाबतीत बायजा बरीचशी कर्मठ. मग, मीही दोन तीन दिवस थांबणे का होईना पण माईला सोबत घेऊनच जाईल म्हणून बायजा मागे लागायचो.
मग दिवसभर बाजारात (दर्जा) फिरून झाले की बोर व्हायचे.

संध्याकाळी मागच्या हौदात उडी मारून आंघोळ करायचो, मजा यायची पण लगेचच समोर एवढ्याश्या बहिणीला जड साडी आणि पदर सांभाळत भांडी घासताना बघून कसचच व्हायचं... साक्री ची लाडकी भारती माई मात्र इथे सूनबाई म्हणून वावरतांना कुणीतरी परकी वाटायची!

पण रात्री ओपन थेटरात वाळू वर बसून सिनेमा पाहिला की कासाऱ्याचा मुक्काम सार्थकी लागायचा. पुन्हा थेटरात मालपुरचा भय्या दादा भेटला की फुकट तिकीटाची सोय व्हायची, तेवढेच पाचं रुपये वाचायचे. त्यावेळी सिनेमा बघणे म्हणजे एक मोठा सांस्कृतिक सोहळा असायचा कासाऱ्यात. घरोघरींचे बाया बापडे चादरी गोधडी घेऊन सिनेमा आवर्जून बघायचे. विरासात, बाजिगर, हीरो नंबर वन, राजू बन गया जेंटलमन इत्यादी सिनेमे कासाऱ्यात ओपन टाकीत मोकळ्या आकाशाखाली बसून बघितलेत. वाचकांना खोटं वाटेल पण ' चेन्नई एक्स्प्रेस ' या सिनेमाच्या जाहिराती शुट करतांना मी हे प्रत्यक्ष शाहरुख खान ला ही सांगितले होते. त्यावेळी त्यांनी देखील ओपन थियेटर ला हसून दाद दिली होती.

बायजा ला भेटून झाले की आक्काकडे निघायचो. आक्काच्या मागील दारी बोरांच झाडं आणि अळूची पान लावलेली असायची. पुन्हा वाटेत काळ्या गंगूताईचे झाडे लागत...ती गंगूताई तोंडात टाकत आक्काचे घर गाठायचो.

आक्का कडे घरात घुसताच आपण स्वतःच माठातून पाणी घ्यायची पद्धत होती. त्यानंतर आक्का बशीत दही टाकून सांजोरी द्यायची. त्यावेळी आक्का कडे दूध धुपते भरपूर असल्यामुळे घट्ट दुधाची मऊ दही मिळायची. पुढच्या ओट्यावर अप्पा नेहमी दोरी बनवताना दिसतं. इतकी दोरी बनवून अप्पांनी नक्कीच शंभरावर खाटा बनवल्या असतील असं वाटायचं. आक्काच्या घरी नेहमी खाऱ्यातील लोणचे असायचे. बरणीतील लोंच्या पेक्षा त्याची चव भन्नाट वाटायची. मग मी हळूच खोलीत शिरून ते लोणचं खायचो. बाजूला बोरं सुकायला टाकलेली असत. ती देखील मुठभर खिशात ओतायचो. भज्यांची आमटी आणि भात ही आक्काची स्पेशालिटी. आक्काच मागचं दार मला खूप आवडायचं. त्या दारातच सर्व जण बसत. दाराला मोठं मोठे किल्ल्यावर असतात असे खिळे लावलेले होते. त्यावेळी त्याचं डिजाइन खूप आवडायचं.

माणूस बालपणी जे बघतो ते त्याच्या कायम स्मरणात राहत. वाचता यायला लागलं तेंव्हा कथा कादंबऱ्यातील गावं खेड्याचे वर्णन आले की कासाऱ्यातील आक्काच्या  घरासारखा दरवाजा किंवा पुढची पडवी, बायजा सारखा वाडा, मधली बोळ...छडवेल सारखं खळ किंवा खोल्या... तामसवाडी सारखा पार किंवा मळा हेच इमॅजिन व्हायचं. किंबहुना आजही होतंय.

हळू हळू वर्ष सरत गेली. मोठे झालो तरी बायजा आक्कला भेटायला कासाऱ्याला जायचंय हा नियम होता. दादा गेल्यानंतर मात्र माझ जाणं तसं कमी झालं. मधल्या काळात तिथे देखील खूप बदल झालेत. व्यावहारिक विचार करून राजू दादा आणि बापूंनी घराचा वाडा पाडून नवीन घर बांधलं आणि मागची जागा मोकळी केली. तिथला हौद तोंडून टाकला. जमीन तीच पण घर बदललं. उंच चिरी म्हणून अण्णांना घराचा अभिमान वाटायचा. पण मला मात्र प्रत्येक भेटीत तिथला तो वाडा आणि हौद च आठवायचा.
आक्का चं घर होत तसचं राहिलं पण काळानुरूप निगा नसल्यामुळे ते ही अधिक भकास वाटायला लागल.

शिक्षण संपवून मुंबईला नौकरी करायला लागलो. संसारात रमलो मग मध्येच आप्पा गेल्याचा फोन आला तेंव्हा कासाऱ्याला गेलो. बापू वारले तेंव्हा गेलो. बायजा च्या वेळी प्रचंड पावसात रात्रीची गाडी चालवत गेलो पण अंतिम दर्शन झाले नाही. आण्णांच ही तसचं. प्रत्येक प्रवासात कासाऱ्याच्या आठवणीं यायच्या. पण यावेळी जरा वेगळं वाटतंय. आक्का जणू कासाऱ्याचा शेवटचा मेंबर.

कुणी नुसतं, मामाच गावं म्हटलं तरी ' तामसवाडी ' डोळ्यांसमोर उभं राहतं. पण आत्ताचं नाहीं. जुनं. धरणात बुडालेले. मनाला हुरहूर लागते की ते गावं आपण पुन्हा कधीच बघू शकणार नाहीं म्हणून. पण तामसवाडी बाबत निदान ही कल्पना असते की ते खरंच धरणात बुडालय. पण कासाऱ्याचे काय...? गावं तिथेच आहे. घरं आहेत. पण तेथील माझी माणसं कुठे आहेत... आणि माणसचं नसतील तर गावाला तरी, काय अर्थ आहे...

No comments:

Post a Comment