Tuesday, 28 June 2011

आठवण

संद्याकाळीच मन उगीचः कातर होत. 
कुणाचीतरी आठवण यावी म्हणून भिरभिरत राहत...
आयुष्याच्या कुठल्यातरी टप्प्यावर कुणीतरी जीवाभावाचे भेटलेल...
त्याच्या सोबत घालवलेले क्षण...ते दिवस...तो ऋतू... 
असे काहीतरी उगीचच मनात कुजबुजत राहत...
एकीकडे आकाशात क्षणाक्षणाला रंगांची उधळण होते...
कधी तांबडा, कधी केशरी तर कधी हळदी प्रमाणे पिवळा...
प्रत्येक रंग जणू वेगवेगळे प्रसंग घेऊन येतो.
भूतकाळाच्या वळणांवर भेटलेले ते 'क्षण'... 
आज ज्यांना आपण 'आठवण' म्हणतो....


नाहीतरी, आता आठवणी शिवाय काय उरलय माझ्या जगण्यात.
तुम्ही जाऊन आता वर्ष झाल. 
पण, अजूनही तुम्हाला वगळून विचार करायची सवय नाही झाली. 
माझ स्वतःच अस अस्तित्व होतच तरी कुठे...
लग्नानंतर काही दिवसातच कळल होत कि आपल्याला आयुष्याचा 'खरा जोडीदार' मिळाला. 
तुमची वागणूक आणि इतरांसाठी जगण्याची वृत्ती...
तेंव्हाच ठरवल होत, हे आयुष्य आता फक्त तुमच्यावर ओवाळून टाकायचं.                                                       

 
तुमच्या सोबतीच हे 'जगण', किती सुंदर होत...
किती लहान होतो आपण, लग्न झाली तेंव्हा...पण तरीही तुम्ही किती गंभीर वागायचात.
कदाचित जबाबदाऱ्यामुळे असेल पण लहान वयातही तुम्ही कधी 'अल्लड' नाही वाटलात.
घरातील कार्य, सण, समारंभ, लग्न साऱ्या जबाबदाऱ्या आपण पार पाडत होतो.
कधी परिस्थितीशी, कधी समाजाशी तर कधी वेळ आलीच तर स्वताशीच लढत होतो.
तुमचा समाजावर आणि सामाजिक संस्थेवर प्रचंड विश्वास होता म्हणून तुम्ही नेहमी नियमानेच वागायचात 
पण त्या वागण्यावर कुठलेच दडपण नव्हत.
नदीने पठारावरून जसे अगदी 'सहज' वाहत राहावे तसे... 


त्याकाळी खूप कमी लोकांकडे गाडी असायची. 
तुमच्या बरोबर मोटारसायकलवर पाठी मागे बसून जेव्हा 'माहेरी' जायची त्यावेळी कसला अभिमान वाटायचा स्वताचा, स्वताच्या भाग्याचा...
हिरव्यागार रानातला तो कच्चा रस्ता कधी संपूच नये अस वाटायचं.
असे कितीतरी क्षण, असंख्य प्रसंग...  
भविष्या विषयीचा सकारात्मक दृष्टीकोन, कुटुंबाची स्वप्न, डोळ्यात दिसायचीत तुमच्या.
किती विश्वास होता तुमच्यावर...किती 'आधार' वाटायचा तुमच्या असण्याचा...
माझ्या विश्वासाला नेहमी फुला सारखे जपत राहिलात तुम्ही...!


दिवसामागून दिवस जात राहिले...वर्ष गेली...
सुख आली, दुखं गेली...
सर्व जबाबदाऱ्या पार पडल्या...
तुमच्याच, शब्दात सांगायचं तर आपण 'जिंकल'....

पण...

ती पौर्णिमेच्या आधीची रात्र होती...
चंद्र खूप मोठा दिसत होता आकाशात...
हवा कुंद आणि उन्हाळलेली जमीन...

क्षणात आकाशात बदल होतायत...
संध्याकाळचा तांबडा, केशरी, पिवळा...पूर्ण 'काळा' झाला आहे...
आता बाहेर पाऊस पडतोय...
पण त्याचा एकही थेंब माझ्या वाट्याला नाही...
हि सर्व धरतीच तृप्त होते म्हणतात पाऊसाने...मी मात्र कोरडी...आता कायमच...  

2 comments: