Saturday, 30 May 2020

गंध (भाग दोन)

गंध (भाग दोन)

[भाग एक वाचण्यासाठी याच टाइम लाईन वर खाली स्क्रोल करा]



‘बाली’ हे इंडोनेशिया या देशातील टूरिस्ट डेस्टिनेशन. पहिल्यांदा देशाबाहेर गेलो ते या ठिकाणी. समुद्र किनाऱ्यावर वसलेले अत्यंत सुंदर शहर. विमान जोवर प्रत्यक्ष जमिनीवर लॅन्ड होत नाही तोवर सतत भीती वाटत असते कि, हे पाण्यावर उतरतय कि काय. इतकी ती समुद्राच्या काठाला लागून असलेले धावपट्टी...! त्यामुळे, विमानाच्या खिडकीतून पाहिल्यास निळ्याशार समृद्राच्या त्या पाण्यात आणि बालीच्या हिरव्यागार भूपृष्ठात कमालीचा शृंगार जाणवतो.

विमानतळापासून ते हॉटेल पर्यंत एक विशिष्ट गंध मला जाणवत होता. सुरवातीला वाटलं, आपण पहिल्यांदाच परक्या धर्तीवर आलोत म्हणून हे वेगळेपण वाटत असावे. पण जेंव्हा शहरभर फिरलो. तिथल्या मंदिरांना, समुद्र किनाऱ्यांना भेटी दिल्या त्यावेळी कळलं तिथे बहुतांश ठिकाणी एक विशिष्ट वनस्पती होती आणि तिचा तो गंध होता, आपल्याकडे पुदिनाच्या पानांचा असतो तसा. जो तेथील चराचरात मिसळून गेला होता. आजही कधीतरी कुठल्या मॉल किंवा थियेटर ला गेलो कि तिथल्या बंदिस्त वातानुकुलीत वातावरणात रूम फ्रेशनर चा तोच गंध मला जाणवतो आणि बाली ची भेट आठवते.

सकाळी, ‘बाली’ च्या रस्त्यांवरून फेरफटका मारत होतो. सोबतीला ‘मिंट फ्रेश’ गंध होताच. दुकानं नुकतीच सुरु झाली होती. इथल मार्केट म्हणजे आपल्या सारखं गर्दीच नाही. खूप सुटसुटीत. शांत. एका गल्लीच्या  कोपऱ्यावर उभा होतो. समोर एक रेस्टोरेंट होते. आपल्याकडे जुने वाडे असतात त्या प्रमाणे दिसणारे. बाहेर फुलझाडे. अंगण रस्त्याला लागून, सकाळी त्यावर पाणी मारून स्वच्छ केलेले.

दुरून एका इंडोनेशियन स्त्रीला बघितले. तिने आपल्या त्या अंगणात एका लोखंडी पाटी मध्ये काही लाकडे  पेटवलेली होती. कुतूहल म्हणून जवळ जाऊन बघितले तर त्यावर रेस्टोरेंट मधील पहिली डिश तिने त्या अग्नीला अर्पण केली होती. कोरड्या लाकडात पेटणार ते अन्न, तो अग्नी आणि त्यातून निर्माण होणारा धूर गल्लीच्या दुसऱ्या टोकापर्यंत आलाच. जिथे मी उभा होता. क्षणभर त्या धुरामुळे मला ठसका जाणवेल असं झालं तर दुसऱ्याच क्षणाला तो धूर मला गावी घेऊन गेला. पितृ पक्षात आजोबांचे आणि काकांचे श्राद्ध असायचे. वडील ते नियमाने पाळत. आपल्या जेष्ठ भावाच्या आणि वडिलांच्या आठवणी आम्हाला सांगायचे. त्याच वेळी आई ने लाकडं पेटवलेली असायची. आम्ही आपल्या ताटातून पुरण पोळीचा एक तुकडा घेऊन त्यावर खीर, सार भात, भाजी आणि ताटातील सर्व जिन्नस एक एक करून टाकायचो. नंतर ते उचलून त्या अग्नीत समर्पित करायचो. वर ते पेटावे म्हणून दोन पळी तूप. त्यावेळी त्या अग्नीतून जो गंध निर्माण व्हायचा तोच मला बालीच्या या गल्लीत जाणवत होता. वडील त्या अग्नीला नमस्कार करून आपले जे आप्तेष्ट हयात नाहीत त्यांचे स्मरण करायचे. त्यांना जेवायला या म्हणून सांगायचे. त्या निमित्ताने आपण त्यांची आठवण तरी काढतो अशी त्यांची धारणा होती. आम्ही हि मग निरागसपणे आबा, दाजी, ताई अशी नाव घ्यायचो... बालीच्या त्या अनोळख्या गल्लीत मी त्या दिवशी नकळत असेच दुरून डोळे मिटून घेतले होते. आणि हि सर्व नाव पुटपुटलो होतो.

दुसरी आठवण आहे ती जर्मनीतील, म्युनिक या शहराच्या विमानतळा बाहेर च्या अनुभवाची. मुंबईतील मे महिन्याच्या कडकडीत उन्हातून दूर युरोप ला निघालो होतो. वाटेत दुबई. मुंबईच्या टर्मिनल टू पासून दुबई चे DXB एअर पोर्ट. मग थांबा. पुन्हा नवीन फ्लाईट. शेवटी म्युनिक इअर पोर्ट. जवळपास पंधरा सोळा तासांचा प्रवास. तीन विमानतळ आणि दोन फ्लाईटस. सर्वीकडे बंदिस्त ए सी आणि तेथील रूम फ्रेशनर चा एक विशिष्ट वास. जो या काही तासात सवयीचा होऊन जातो. आणि जेंव्हा तुम्ही अचानक मोकळ्या वातावरणात येता तेंव्हा तो फरक प्रचंड जाणवतो.

इमिग्रेशन चे सोपस्कर पार करून म्युनिक विमानतळा बाहेर पडलो तर अचानक झटका लागावा असं झालं. पूर्वी कधीही न अनुभवलेलं ते वातावरण. मुंबईच्या पस्तीस चाळीस डिग्री सेल्सिअस मधून म्युनिक च्या चौदा पंधरा डिग्री मध्ये गारठ्या बरोबर तेथील हवेत एक अत्यंत फ्रेश गंध जाणवला. मी अंगात कोट आणि नाकात हा गंध साठवून घेत होतो. अजून बस यायची होती. विमानतळ तसे छोटे पण शांत वाटत होते. ओळीनी येणाऱ्या टैक्सी, शिस्तीती उभ्या असलेल्या बसेस, एका रेषेत आपल्या व्हील बैग्स नेणारे गोरे प्रवासी बघून, हिटलर च्या भूमीतील शिस्त जाणवली.

बस शहराला वळसा देऊन आता हायवे ला लागली होती. जर्मनीतील हे ‘म्युनिक’ ते चेक रिपब्लिक या देशातील ‘प्राग’ शहरा पर्यंत मला प्रवास करायचा होता. सहा - सात तासांच्या या रोड जर्नी बद्दल मी खूपच उत्सुक होतो. खिडकीतून येणारा मोकळा थंडगार वारा आणि समोर दिसणारी तेथील छोट्या टुमदार गावांची दृश्य.
मधेच पाईन वृक्षांचे एखादे छोटे जंगल, तर रस्ता ओला करणारा भुरभुर पाउस. आपण कुठल्यातरी थेटरात बसून शाहरुख खानचा सिनेमा बघतोय कि काय अशी माझी अवस्था. रिफ्रेशमेन्ट  साठी बस हायवे ला लागून असलेल्या एका पेट्रोल पंप कम ढाब्यावर थांबली होती. आमची बस सोडली तर तिथे कुणीच न्हवत. इतक्या मोठ्या शॉप मध्ये फक्त एकच म्हातारा तो हि काउंटर वर. मला क्षणभर वाटलं कि आता लगेच DDLJ चा शाहरुख आपल्या मित्रांसोबत ओपन कार मधून जंप मारून येईल आणि समोर बसलेल्या या म्हाताऱ्याला पेन किलर टेबलेट्स द्या म्हणून खोटंच सांगून समोरचा बियर केरेट  उचलून नेईल...

चिर्रर...करून मित्राने बिअर कॅन ओपन केला आणि माझ्या समोर धरत...lets take it, cheers म्हणत माझ्या हाती हि सोपवला. मी मघास पासून त्या बियर च्या रैक कडे बघत होतो म्हणून कदाचित त्याला हावरट वाटलो असेल कि काय असा विचार डोक्यात येऊन गेला क्षणभर. पण फेसाळत्या कॅन कडे दुर्लक्ष करून चालणार न्हवत.  मी मनोमन DDLJ च्या राज मल्होत्रा ला चिअर्स करत कॅन तोंडाला लावला. बियर चा तो वास मला नौकरीच्या स्ट्रग्लिंग डेज मध्ये घेऊन गेला.

आठ हजार पर मंथ पगारावर मी जाम खुश होतो. बोरीवली ते अंधेरी रोज प्रवास करावा लागायचा. बारा-पंधरा तास कामाची नौकरी. थकून जायचो. पण आपण पगार कमावतो याचा आनंद इतका असायचा कि कामाचं काही वाटायचं नाही. त्यात रविवार ऑफ. बालपणीचे मित्र वेगवेगळ्या क्षेत्रात असूनही एकाच  रूमवर राहायचो. सर्वांची परिथिती जवळपास सेम. त्यातील एकाला कंपनीकडून ‘सोडेस्को’ चे कुपन मिळायचे. त्या कुपनवर रविवार आम्ही पार्टी करायचो. पाच कुपन दिले कि तीन बिअर, ग्रीन सलाड  आणि भरपूर चखना मिळायचा. संध्याकाळचा मंद प्रकाश, पेपरवर अंथरलेली बिअर मग्स, चखना, सलाड, बॉईल्ड एग्स आणि काही कार्यकर्त्यांच्या हातातील सिगरेटस मिळून एक कुबट, आंबट वास निर्माण व्हायचा. त्या बंदिस्त वातावरणात, एक कमालीचा ‘फ्रीडम फील’ होता. मग जो तो आपल्या कामाचे, आयुष्याचे फ्रस्ट्रेशन काढायला लागायचा. कुणी बॉस ला शिव्या द्यायचे तर कुणी आपल्या परिस्थितीला बोल लावायचे. एखादा आपल्या ब्रेकअप झालेल्या मैत्रिणीच्या नावानी रडायचा. मग सर्वच त्या आंबट – कुबट वासात त्याच सांत्वन करायचे. जोरजोरात शिव्या द्यायचे. सुरवातीला दूर असणारा मी, शिव्या देण्यात कधी एक्स्पर्ट झालो हे मला हि कळलं नाही.

तो आंबट कुबट वास मला माझ्या आतील विकृतीची आठवण करून देतो. अशी विकृती जी आतमध्ये खोलवर दबून, सर्वच निमुटपणे सहन करत असते. वर एक मुखवटा घेऊन सतत चांगुलपणाचा आव आणत असते. मग अश्या एखाद्या प्रसंगी बिअर आणि चखण्याचा तो आंबट-कुबट वास ती विकृती बाहेर काढते. आणि आयुर्वेदातील ‘वमन’ केल्याप्रमाणे शरीर आणि मन दोघेही साफ होऊन जातात. नदीकाठच्या वाळूच्या तळ्याप्रमाणे!
लहानपणी गावभर उनाडक्या करून आम्ही थकलो कि नदीकाठी पाणी प्यायला जायचो. सरळ नदीतील पाणी न पिता बाजूला वाळूत एक खड्डा खोदायचो. त्यात हळूहळू पाणी जमा व्हायचं.  सुरवातीला ते गढूळ असायचं. ते पाणी उपसून काढलं कि नंतर स्वच्छ निर्मल पाणी उरायचं. जसा बिअर चा शेवटचा कॅन संपल्या नंतरच्या पहाटेचा मोकळा वारा आणि त्याचा मिंट फ्रेश गंध... 

(क्रमश.)

   


Thursday, 14 May 2020

गंध (भाग एक)

गंध (भाग एक)


बाहेर पक्षांचा चिवचिवाट होतोय. नुकतंच उजाडलं आहे. पौर्णिमेच्या नंतर ची पहाट. शेजारच्या ताईंनी आज जरा लवकरच झाडांना पाणी दिलंय बहुतेक. ओल्या मातीचा गंध सुटलाय छान.
मी बागेतून पुदिना तोडून आणला. पाण्याला आता मस्त उकळ फुटलाय. थोडी चहा पत्ती आणि काही पुदिना ची पाने...येणारा जास्तीत जास्त गंध मी नाकात साठवून घेतोय.
एका क्षणात डोक्यातील एका मागे एक सर्व फोल्डरस, सब फोल्डरस आणि त्यातील असंख्य फाईल्स ओपन होतायत...

या वासात किती पावर असते नाहीं! फार पूर्वीचं, दूरवरच आठवायला लागतं. अश्या कुठल्या संवेदना असतील अशी कोणती तारं जोडली जात असतील जी क्षणात तुम्हाला भूतकाळात नेतात. माझा आणि या गंधाचा असा नेहमीच संबंध येतो. कधी हा गंध स्वतः माझ्या वाटेल येतो तरं कधी मी प्रयत्नपूर्वक त्याला आडवा जातो.

हे गंध तरी किती प्रकारचे... कसले कसले... कधी फुलांचे, कधी पदार्थांचे, कधी व्यक्तींचे तरं कधी जागांचे...


पहाटेचा चहा म्हटला की मला इंजिनिअरिंग कॉलेज च्या नवख्या दिवसांची आठवण येते. शहरापासून दूर छोटसच टाऊन. तिथून वाहणारी नदी आणि त्यावर मोठा लांबलचक पुल. त्याला लागून असणाऱ्या छोट्या गल्लीत झाडांनी वेढलेले षटकोनी आकाराचे तीन मजली हॉस्टेल. सर्वात वरच्या माळ्यावर माझी रूम. मधोमध मोकळी जागा.

सकाळी उठल्या बरबोर चहा ही जुनी सवय. तीन माळे उतरून आळस देतं देत हॉस्टेल च्या बाहेर पडायचं. काही पाऊले चालल की छोटी चौफुली लागायची. एक रस्ता शहरा च्या दिशेने तर  दुसरा पुल ओलांडला की कॉलेज कडे जाणारा. 

राजू भाऊ पहाटे चार पासून आपलं चहा च दुकान सुरु करायचा. कधी सोबत म्हातारी आई असायची तर कधी एकटाच. जुनी कोळश्याची शेगडी, ज्याला उजव्या बाजूला एक हैंडल असतं. ते फिरवले कि कोळसा गरम होतो. वर पितळी केटली. त्या कोळश्याचा वास जणू चहा मध्ये मिसळून जायचा. थंडी च्या दिवसांत किमान दोन तीन कप एकाच वेळी मी प्यायचो. चहा सोबत त्या धुंद वासाला हि आत ओढून घ्यायचो....

पहिल्यांदाच घर आणि गावं सोडून बाहेर पडलो होतो. समर व्हेकेशन क्लासेस च्या नावानी एक सोपस्कार करावा लागतो छोट्या गावातील मुलांना. पालकांना आणि एकूणच सिस्टीम ला वाटत असत कि हे क्लास लावले म्हणजे आपली मुलं एकदम आय आय टी किंवा मेडिकल ला सिलेक्ट होतील वैगरे. मी हि त्यातलाच.

क्लास जिल्ह्याच्या ठिकाणी. राहायला क्लास पासून जवळच असलेल्या गल्लीतील, एकदम छोटीशी रूम. शेजारी पिठाची गिरणी. दिवसभर या गिरणीचा आवाज आणि पिठाची धूळ. डोकं जड़ व्हायचं. त्यात पहिल्यांदा घराबाहेर पडलो म्हणून होम सिक वाटायचं. मेस चे जेवण खाऊन कंटाळा आलेला. संद्याकाळी क्लास सुटला कि त्या रूम वर परत यायचो. गिरणी बंद करून मालक स्वयंपाकाला लागलेला असायचा. दिवसभर पिठाचा वास आणि गिरणीच्या आवाजाची जागा आता त्याच्या छोट्या स्टोव्ह नि घेतलेली असायची. स्टोव्ह वर शिजणाऱ्या खिचडीचा खमंग वास यायचा. त्या नुसत्या वासानी आपण गावी घरी आहोत हि फिलिंग यायची. घराचं महत्व जाणवायला लागायचं. आई दिवसभर काम करून सर्वांसाठी स्वयंपाक करते, वडील कसे नौकरी करून थकून जातात. सर्वच कसे कुटुंबासाठी राबतात. आपल्याला मात्र तिथे असतांना या सर्वांची कधीच का जाणीव नसायची. एका क्षणात विचारांची शृंखला सुरु व्हायची. त्या कोवळ्या वयात फक्त ‘खिचडी’ च्या वासाने हि जाणीव व्हावी...कमाल आहे!



इंजीनिआरिंग ड्रोप आउट चा शिक्का घेऊन अजून मोठ्या शहरांत गेलो. अगदी ठरवून. कधीही न परतण्यासाठी. प्रंचंड निराशा. अगदी दिशाहीन मार्ग. तासंतास फक्त लायब्ररीच्या कुठल्यातरी कोपऱ्यात हरवून जायचं. हातात पडेल ते वाचायचं. स्पर्धा परीक्षांची पुस्तके, कादंबऱ्या, कविता...अगदी काहीही. रात्री उशिरा सर्वीकडे सामसूम झाली कि उरलेसुरले पेपर्स, कात्रण वाचून ग्रंथपाल आणि मी दोघेही लायब्ररी बंद करून बाहेर पडायचो. शहरातल्या उच्चभ्रू कॉलनीतील तो शांत रस्ता. अगदी ओळीने बंगले. त्यातल्या मधोमध असणाऱ्या छोट्या बंगल्या च्या कुंपणाला लागुनच पारिजात चे झाडं होते. त्या पांढऱ्या फुलांचा सडा रस्ताभर पडलेला असायचा. कुंपणाच्या भिंतीला लागून अगदी छोटेसेच शंकराचे देऊळ होते. तिथे कुणीतरी संद्याकालचा दिवा पेटवलेला असायचा. त्या दिव्याचा मंद प्रकाश आणि पारिजात चा तो धुंद करणारा सुवास...कितीतरी वेळ मी तिथे नुसताच उभा असायचो, दिव्यातील उरलेले तेल संपेपर्यंत...


दिवाळी निमित्त सुट्टीत गावी पोहचलो कि, एस टी स्टेन्ड ते घरी पोहोचेपर्यंत प्रत्येक गल्लीत त्यावेळी  एक वास हमकास यायचाच. उत्सव डीस्टेम्पर! जब घर की रोनक जगानी हो, दीवारों को जब सजाना हो...नेरोलेक नेरोलेक. या जाहिरातीचे जिंगल आणि त्या नव्या कोऱ्या रंगाचा वास. प्रंचंड फ्रेश वाटायचं. आमच्या मातीच्या घराला जेंव्हा हा रंग लावायचो तेंव्हा हळूहळू तो भिंतीच्या आता मुरायाचा, त्याचे छोटे छोटे बुडबुडे निघायचे, कुणी खिदी खिदी करून हसतोय जणू. त्या रंगाच्या हसण्यात आपणही मिसळून जायचं आणि उत्साहाने दिवाळीच्या मंगल सणाला सामोरे जायचे. रंगाचा वास मला आजही नव्या उम्मेदीचा, नव्या स्वप्नांचा वाटतो.

मातीचा गंध म्हटला कि मला आठवतात पुणे विद्यापीठातील पायवाटा. ज्ञानेश्वर भवन, मेन बिल्डींग, बॉईज होस्टेल ते ओपन कॅन्टीन, एलीस गार्डेन पासून मेन बिल्डींग पर्यंतचा निमुळता रस्ता आणि औंध गेट ते जयकर ग्रंथालया कडचे नागमोडी वळण. धो धो पडणारा पाऊस. छत्री नाही कधीच सोबत. त्यामुळे धावत कुठल्यातरी ओट्याच्या आडोशाला उभे राहायचे. लवकरात लवकर, ओल्ड कॅन्टीन, अनिकेत किंवा ओपन कॅन्टीन यांपैकी जी जवळ असेल तीच्या आवारात पळत जायचे. ओल्या कपड्यात कटिंग चहा पिण्याची मजा शब्दात सांगता यायची नाही! त्या भारावलेल्या दिवसात कुणीतरी छत्री ऑफर केली आणि एक नवीन गंध या सर्वात मिसळून गेला. या गंधांनी रोमांच उभे राहत. भारावलेले दिवस मंतरलेले होऊन जात. हा गंध वेडी स्वप्न बघायला लावणारा होता. बिनधास्त होता. बंधन झुगारून देणारा, स्वतंत्र होता...       


विद्यापिठा समोर एका अरुंद गल्लीत एक छोटेसे गणपती मंदिर होते. त्याची रचणा जरा विचित्र वाटायची. एखाद्या छोट्या चाळीत किंवा वाड्यात शिरल्याप्रमाणे आत जायचे, सुरवातील तिथे राहणारी काही बिऱ्हाड दिसत. त्यांच्या घरातील स्वयंपाकाचा, वेगवेगळ्या फोडणींचा वास पार करून आत गेलं कि ते सुंदरस देवूळ दिसे. उदबत्तीचा वास या सर्व वासात मिसळून एक नवीनच गंध तयार व्ह्यायचा. तिथे डोळे मिटून बसले कि खूप शांत वाटायचं. मी त्याला माझ्या अध्यात्माचा गंध म्हणून ओळखतो. तो आजही मला अधूनमधून भेटत राहतो. त्यासाठी नेहमीच देवळात जाण्याची मला गरज भासत नाही. नौकरी करत असतांना चहा चे निम्मित करून मी ऑफिस खाली फेरफटका मारून येतो तिथे हा गंध मला भेटतो., एखाद्या शुटींग सेट वर संध्याकाळचा शॉट घेण्याची तयारी चालू असते, केमरामन लायटिंग करत असतो, कलाकर, स्पॉट बॉय, प्रोडक्शन यांची लगबग चालू असते. या साऱ्या गोंधळात मी कोपऱ्यात बसून हा गंध अनुभवू शकतो आणि त्याचा अध्यात्मिक आनंद हि घेऊ शकतो, अगदी दिग्दर्शक म्हणून डेड लाईन आणि जबाबदारी असली तरी...!

बऱ्याचदा मुंबईतल्या ट्राफिक मध्ये, स्टेशन कडे जाणाऱ्या रस्त्यांवर, दादर किंवा परळच्या एखाद्या सिग्नल वर जेंव्हा एखादा पोऱ्या मोगऱ्याच्या फुलांची माळ विकत असतो, कुणीतरी म्हातारा आडोशाला अगरबत्ती घ्या म्हणून ओरडत असतो...अश्यावेळी अगरबत्ती, पारिजात-मोगऱ्याच्या त्या गजरयासाठी   नियमांचे काटेकोर पालन करणारा, माझ्यासारखा नेमस्थ, सिग्नल वर खोळंबून पाठीमागच्या ड्रायव्हर्स च्या शिव्या हि खाऊ शकतो. कारण त्या क्षणाला तो गंध मला माझ्या कार च्या बंदिस्त केबिन मध्ये हवा असतो. माझी अध्यात्मिक अनुभूती होण्यासाठी...

(क्रमश.)

Thursday, 7 May 2020

काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका लढवय्या कामगार नेत्याचा आज स्मृती दिवस🙏

बाळू बंडू पाटील-
काळाच्या पडद्याआड गेलेल्या एका लढवय्या कामगार नेत्याचा आज स्मृती दिवस🙏


आज दादांचे दहावे पुण्य स्मरण. नेहमीच लिहीत असतो. पण दादांविषयी लिहायचं म्हटलं की लेखणी पुढे सरकतच नाही. असं नाहीये की मी ते टाळतो. पण किती आणि काय काय लिहायला हवं हे समजत नाही. आणि गेली दहा वर्ष हे सतत होतंय माझ्या बाबत...

दादा गेले तेंव्हा ते ६३ वर्षांचे होते तर मी २८ चा.
माझा प्रवास नुकताच कुठे सुरू झालेला तरं दादांचा अवघ्या त्रेसष्टव्या वर्षीच तो सुफळ संपूर्ण झाला होता.
खरंतर, त्याच्याही दोन तीन वर्ष आधीच!

' जगणं ' पूर्ण झालं असं ठरवता येतं नाही खरंतर. पण तरीही, प्रत्येक व्यक्ती जी जन्माला येते तिचं प्रारब्ध ठरलेलं असतच. तिथवर फक्तं किती जलद आणि किती सुरळीत तुम्ही पोहचता हे महत्वाचं. क्वचित नशीबवान लोकांचा तो प्रवास इतक्या सहज होतो, जसा दादांचा...

एक मुलगा म्हणून, भाऊ म्हणून असेल किंवा नवरा आणि नंतर वडील या सर्वसामान्य भुमिकांसोबतच दादांचे सामाजिक आयुष्य देखील मोठे होते. आपण जगतो स्वतः साठीचं, पण ते करत असतांना देखील आपण राहतो त्या ठिकाणचे तेथील लोकांचे काहीतरी देणे लागतो याची जाणीव खूप कमी लोकांना असते. ती जाणीव दादांना होती. जी सतत त्यांच्या कृतीतीतून समोर येतं राहिली अगदी शेवट पर्यंत.

त्याकाळचे आयुष्य प्रत्येकाचेच खडतर होते. खासकरून ग्रामीण भागातून शिकून पुढे आलेल्या आणि काहीतरी करु पाहणाऱ्या तरुणांचे.
खूप मोठे कुटुंब. वडील आणि ज्येष्ठ भावाच्या अकाली जाण्याने न कळत्या वयात जबाबदाऱ्या चे ओझे.
तारुण्यातील उसळत्या वयात देखील स्वतःच्या स्वप्नांना मुरड घालून वास्तववादी जगण्याचा स्वीकारलेला मार्ग. कुटुंबाशी आणि जन्माला आलो त्या गावं पांढरी शी जोडलेली घट्ट नाळ कधीच सैल पडू दिली नाही दादांनी.

दादा चा दादाभाऊ...
आणि
बाळू चा बाळासाहेब झाला...
आपण म्हणतो म्हणून हा प्रवास होत नसतो. तो लोकांनी तुमचं कामं बघून तुम्हाला आदरपूर्वक बहाल केलेला असतो.

अजूनही काही विशेषण होतीच.
शेतकऱ्याच्या समस्यांवर पोट तिडकीने बोलणारा तरूण,
आधीचा कॉम्रेड, नंतरचा समाजवादी...
एक विचारी शिवसैनिक ते कामगारांच्या हक्कासाठी प्रसंगी रस्त्यावर उतरणारा लोकप्रिय, कामगार नेता.

हा प्रवास निश्चितच सोपा नसणार. न्हवता.
आज सोशल मीडिया च्या माध्यमातून अनेक लोकं इतरांसाठी काही करण्याआधीच त्या कामाची प्रसिध्दी कशी होईल याची पुरेपूर काळजी घेत असतात.
अश्या वेळी खासकरून दादांचं वेगळेपण जाणवतं.
कुठल्याही प्रसिद्धीसाठी किंवा वयक्तिक फायदा होतो म्हणून त्यांनी कामं केली नाहीत. जे ही केले ते अगदी उत्स्फूर्त. आतून आलेले. त्यात दुसऱ्यावर उपकार करण्याचा ना कधी आव आणला ना कधी गर्व केला.

सुरवातीपासूनच त्यांच्या कामात आणि व्यक्तिमत्त्वात वेगवेगळ्या विचारसरणीचा प्रभाव होता. कुठल्याही एकाच विचारात त्यांनी स्वतःला बांधून घेतले नाही.
आज यांची सत्ता म्हणून फक्तं त्यांचाच उदोउदो करायचा, लागुंनचालान करायचे, स्वतःचा फायदा फक्तं बघायचा...
हे त्यांनी कधीच केले नाही.
याउलट, वेळोवेळी तत्कालीन परिस्थितीला अनुसरून स्वतःच्या विचारात त्यांनी बदल करून घेतला. या मागे फक्तं त्या विचारांचा आपल्या कार्यक्षेत्रातील सर्वसामान्यांसाठी कसा उपयोग होईल हा एकच निकष लावला.

जितक्या उत्स्फूर्तपणे शरद जोशींच्या शेतकरी कामगार पक्षाचा बिल्ला स्वतःच्या छातीवर अभिमानाने मिरवला तितक्याच उत्साहाने लाल बावट्यात कामगारांचे हक्क मिळतं नाहीं म्हणून शिवसेनेचा भगवा खांद्यावर घ्यायला देखील मागेपुढे बघितले नाही.

आपल्या बुद्धीला पटेल तसे ते विचार मांडत राहिले.
आज जेंव्हा त्यांनी वेगवेगळ्या वृत्तपत्रातून वेळोवेळी मांडलेल विचार मी वाचतो तेंव्हा आश्चर्य वाटतं, कुठलीही राजकीय किंवा सामाजिक पार्श्वभूमी नसतांना, कुठलेही मार्गदर्शन नसतांना हा माणूस स्वतः मध्ये असे बदल करून घेत होता. काळासोबत चालत होता. त्यावेळी ' आपला महाराष्ट्र ' आणि ' लोकमत ' या दोन्हीं वृत्तपत्रात त्यांचे कॉलम होते. त्यात शेतकरी आणि कामगार या त्यांच्या जिव्हाळ्याच्या विषयावर ते लिहीत.

पोरा बाळांचे शिक्षण आणि लग्न लाऊन त्यांना मार्गी लावणे यात काही खास असत असं नाही. कमीअधिक प्रमाणात ते सर्वच पालक करत असतात. पण मुलं वाढत असतानां आपण त्यांना कुठले संस्कार देतो. आपल्या कृतीतून कोणते विचार त्यांच्या आत पेरतो या गोष्टींना त्यांनी प्राधान्य दिलं नेहमीच. सतत आर्थिक विचार करत राहणे. संपत्ती मिळवण्यासाठीच फक्तं कामे करणे हे त्यांना मंजूर न्हवते. दोन वेळचे छान पोट भरते ना यात ते समाधानी असायचे.

असमाधान होतं ते सामाजिक व्यवस्थेबद्दल,
शेतकरी आणि कामगारांच्या पिळवणूकी बद्दल,
वेळोवेळी आपल्याला नवनवीन अनुभव मिळायला हवेत आणि जर ते मिळतं नसतील तर त्याबद्दल वाटणारं असमाधान, मोठमोठ्या लोकांच्या भेटी घेऊन त्यांच्या विचारांनी प्रभावित व्हावे, त्यातील चांगले ते घ्यावे वाईटाचा उहापोह करू नये असं ते मानत.

साक्री तालुका आणि पांझरा कान सहकारी साखर कारखाना हे त्यांचे कार्यक्षेत्र. देशाच्या नकाशात अगदी नगण्य. महाराष्ट्राच्या समाजकारणात किंवा राजकारणात याचा फार काही प्रभाव आहे अशी परिस्थिती ना तेंव्हा होती ना आज आहे. धुळे जिल्हा तसा नेहमीच दुर्लक्षित. पण दादांनी मात्र आपल्या या छोट्या कार्यक्षेत्राला नेहमीचं मोठं मानलं.

मला आठवतात साक्रीच्या शेतकी संघातील त्यांच्या गाजलेल्या सभा, तहसील कचेरी समोरील रास्ता रोको, कारखान्यातील गेट मीटिंग, उसाला भाव मिळायलाच हवा म्हणून गावोगावी फिरून केलेले लोकपरीवर्तन, कारखान्यातील व्यवस्था आता भ्रष्ट झाली आहे आणि ती उलथून द्यायला हवी हे जाहीर सभेत मांडतांना ते कधी डगमगले नाहीत की कुणाच्या प्रभावाखाली आले नाहीत. मला पद द्या, निदान आश्वासन तरी... असं म्हणून कधी त्यांनी नेत्यांच्या प्रचारासाठी मांडवली केली नाही.
प्रचार केला तेंव्हा ते सामान्य कार्यकर्तेच राहिले. प्रस्थापितांना डावलून जेंव्हा कारखान्याची नवीन कार्यकारणी निवडून आली तेंव्हा देखील या मंडळींनी आपला उपयोग करून घेतला असं वाटतं असूनही ते सत्तेच्या सकारात्मक परिवर्तना कडे आशेनी बघत होते. लोकांमधून निवडून दिलेल्या, तोवर सर्व सामान्य असलेल्या या पैनल कडून त्यांच्या देखील प्रगतीच्या अपेक्षा होत्या.

पण ज्यावेळी, त्या अपेक्षांचा, स्वप्नांचा भ्रमनिरास झाला त्यावेळी त्यांनी तिक्याच आक्रमकतेने त्यांचा विरोधही केला. समोरून दाखवलेल्या आमिषांना नाकारलं. खरंतर, अश्या काही ' डील ' मिळतं होत्या ज्यांनी किमान आयुष्यभराची तजवीज झाली असती. पण फक्तं स्वतःचाच स्वार्थ बघेल तो कामगार नेता कसला.

बाळू पाटील हा असाच बिनधास्त कामगार नेता होता.
बस्स, झोकून द्यायचं स्वतःला हेचं त्यांना माहीत. आजही त्यांच्या समकालीन नेत्यांशी, कामगारांशी, शेतकऱ्यांशी आणि अगदी विरोधकांशी बोलतांना देखील त्यांच्या विषयी आदरच व्यक्त होतो.

कारखान्याचे माजी चेअरमन आणि तालुक्यातील आदरणीय नेते स्वर्गीय रामराव पाटलांपेक्षा दादा खूप लहान. पण रामराव पाटलाना दीर्घ आयुष्य लाभलं. एका भेटीत ते देखील दादांविषयी भरभरून बोलले.
दादा गेले त्यावेळी म्हसदी चे चळवळीतील नेते बाळासाहेब देवरे यांचे पत्र आलेले. वय झालं म्हणून त्यांना प्रवास झेपत नव्हता. पण त्या पत्रात त्यांनी दादांबरोबर च्या स्नेहा विषयी खूप लिहिलेलं.

झेड पी चे नानासाहेब नागरे, कधी भेटले तरं दादांच्या पहाटे फिरण्याच्या शिस्ती विषयी बोलतातच. उपर, दादांसारखा
'फिजिकली फिट ' माणूस जर असा अचानक जाऊ शकतो तर आमची काय बिशाद... त्यामुळे आम्हीं व्यायाम करणेच सोडले असे मिश्किलपणे सांगतात.

ज्येष्ठ वकील जिभाऊ मराठे असतील, कारखान्यातील माजी व्हाईस चेअरमन डॉ. अशोक पाटील असतील किंवा माजी शिक्षक आमदार जे यू ठाकरे... भेटले तर आवर्जून दादांच्या आठवणी काढतातच.
एकदा स्टार माझा मध्ये असताना नाथाभाऊंच्या भेटीचा योग आलेला त्यावेळी त्यांना मी त्यांच्या साक्रीतील जुन्या भेटीची आठवण करून दिली त्यावेळीं मिशी वाला कामगार नेता म्हणून त्यांना देखील दादा आठवले होते.

मी खूप लहान होतो. शाळेच्या दिवसांत जगाशी काही देणे घेणे नसते फार. त्यामुळे बिन्धास्त असायचो. घरी खूप लोकं यायची. ते सवयीचच होतं आम्हाला. कारखान्यात त्या वेळचे एक एम. डी. होते कुणीतरी पश्चिम महाराष्ट्रातले.
ते नेहमीच घरी यायचे चहा आणि गप्पा मारायला. एकदा आमच्या एका शेजाऱ्यांनी त्यांची टर उडवयची म्हणून त्यांना विचारलच..."काय हो, रोजचं काय कामं असतं तुमचं दादांकडे?" त्यावेळी, त्या एमडी साहेबांनी विचारनाऱ्यालाच उलट प्रश्न केला होता... "आपण पंढरपूरला विठ्ठलाकडे का जातो...!"

एकदा दादा दोन दिवसांचा मुक्काम करून मुंबईहून परतले होते आणि आपल्या सहकाऱ्यां सोबत स्वर्गीय आनंद दिघे साहेबांच्या भेटी विषयी भरभरून बोलत होते. कारखान्याची कामगार शाखा त्यांनी शिवसेनेशी सलग्नित केली होती. पुढे तालुका भर शिवसेनेच्या असंख्य शाखा उभारल्या. तो काळ त्यांच्यासाठी सर्वाधिक झपाटलेला काळ असावा असं वाटतं. आजही जुन्या साक्रीतील भाडणे रोड चे मंडप डेकोरेटर्स युसुफ भाई मला शिवसेना वाले दादासाहेब का छोकरा म्हणूनच बोलावतात.

ते कॉम्रेड होते. शिवसैनिक होते. समाजवादी होते. आपल्या उद्देशांसाठी जी विचारसरणी कामं करेल तिचा स्वीकार करायचा हा हेतू स्पष्ट होता. ते नेते कमी आणि कार्यकर्ता अधिक होते.

मधल्या काळात कारखाना बंद पडला आणि तालुक्याच्या प्रगतीलाच जणू घरघर लागली. अनेक कामगार देशोधडीला लागले. शेतकर्यांचे हक्काचे उसाचे उत्तप्न दुरावले. दादांना त्यावेळी खूप त्रास झाला. स्वतच्या आर्थिक बाजूला सावरता सावरता इतर कामगारांना जमेल तशी ते मदत करत होते. चळवळ थंडावली होती. अनेक नेत्यांचे उंबरठे झिजवले. कारखाना चालू व्हावा म्हणून पुढाकार घ्या अश्या विनवण्या केल्या. पण परिस्थितीत काहीही सुधारणा झाली नाही. तो त्यांच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळ होता.

शिकण्याच्या वयात, कामगाराच एखादं पोरगं आठवडे बाजारात खाट लाऊन बसलेले दिसलं तरी त्यांना जेवण जात नसे.
अनेक कामगार, कुणी किराणा दुकानात झाडू मारताना दिसे तरं कुणी गावी स्थलांतरित झाला अशी बातमी येई. दादा स्वतःही आपलं सर्वच गमावून बसले होते. त्यात एखादा कारखान्याच्या कॉलनीतील तरुण घरी पेढे घेऊन यायचा, शहरात नौकरी लागली सांगायचा त्यावेळी दादांना खूप आनंद होत असे.

वेळ गेला तसा तालुक्याला कारखान्याचा विसर पडला. देशोधडीला लागलेले कामगार तर अनेकांच्या हसण्याचा विषय होते. पूर्वी सुटाबुटत फिरणारे कसे उधारी मागत फिरतात असे टोमणे ऐकायला मिळतं. त्यावेळीं इतरांसाठी दादांना खूप वाईट वाटे. दादांनी कधी उधारी केली नाहीं की कुणाचे पैसे बुडवले नाहीत. स्वतःचा सन्मान जसा होता तसाच शेवट पर्यंत त्यांनी अबाधित ठेवला. त्यांना नंतरही लोकं कामगार नेते बाळासाहेब म्हणूनच आदराने वागवत.

मागे गावच्या शेताकडे भटकत होतो. दुपारचं कडकडीत ऊन. माळरानावर बैलगाडीच्या आडोशाला कुणीतरी रुमाल टाकून झोपलेलं. माझ्या तिथून जाण्याची चाहूल लागली म्हणून तो माणूस झटक्यात उठला आणि रामराम म्हणाला. जवळपास सत्तरीकडे झुकणार वय. चेहऱ्यावर सुरकुत्या. पण भल्या मोठ्या पिळदार मिश्या. पाऊस पाण्याच्या दोन गोष्टी करून मी निघालो तर ते विचारायला लागले...
"भाऊ, तू कोणा आंडोर (मुलगा)...?"
मी म्हणालो, बाळू पाटील. सत्तरीतील तो रांगडा म्हातारा झटक्यात खाली बसला आणि ढसा ढसा रडायला लागला. दादांच्या आठवणीने त्याला गहिवरून आले होते. तो कारखान्यावर चौकीदार म्हणून कामाला होता. आणि ही नोकरी त्याला दादांमुळे मिळाली होती. "आमच्या सारख्यांवर तुझ्या बापा चे लई उपकार रे पोरा..." म्हणून मला आशीर्वाद देत होता.

तशीच एक म्हातारी आजी भेटली एका गावात. ओळख सांगितली तर म्हणाली, " मी अशी अनाथ. माले ना पोरेबाळे, ना वावर... पण दादाभाऊ नी माले पगार चालू करी दिंता..."
संजय गांधी निराधार योजनेत अनेक निराधरांची कामे दादांनी केलेली. म्हातारी त्यातीलच एक होती.

मध्यंतरी, एक चुलत काका मुलींच्या लग्नासाठी स्थळ शोधत होते. पण हवं तसं जमत नव्हतं. बऱ्यापैकी कंटाळले होते. मला म्हणाले, " दादाभाऊ राहता ते अशी परिस्थिती मनावर येऊच नहीं देता..."
' दादाभाऊ च्या भावकितले ' म्हणून आमची तालुक्यात ओळख होती. त्याचा आम्हाला अभिमान वाटायचा. दादाभाऊ सोबत राहिला तरी त्याच्या नुसत्या असण्यानी समोरच्यावर वजन पडायचं, असं त्याच व्यक्तिमत्त्व होते, म्हणाले. त्यांना जमेल तसं ते सांगत होते. पण मला त्यांच्या भावना कळतं होत्या.

दादांचे वास्तव्य साक्रीला. पण पाच भावंडात देखील छडवेल चे त्यांचे घर बाळू पाटलांचे घर म्हणून अनेकांना माहीत होते.

तालुक्यातील शेतकरी, कामगार, अनाथ, गोरगरीब, नातेवाईक, भावकितील अशी अनेक उदाहरणं आहेत.
साक्री गावातील सिंधी समाजातील व्यापारी असतो किंवा मुस्लिम व्यावसायिक सर्वांकडून हाच अनुभव येतो.

आज दादांना जाऊन दहा वर्ष झाली.
खरंतर एक आख्ख दशक.
आज लोकं रक्ताच्या नात्यांना विसरतात तिथे अजूनही कधी गावाकडे गेलो तर एखादा कुणीतरी भेटतोच, दादांची आठवण काढणारा. त्यांच्या कामामुळे, आम्हाला आशीर्वाद देणारा. त्यावेळीं वडील म्हणून दादांचा खूप अभिमान वाटतो. आणि स्वतः ची कीव ही येते. आम्हीं फक्तं आपल्या पुरतेच जगतोय दादा. तुमच्या सारखं आम्हाला नाहीं जमलं... जमणार ही नाहीं कदाचित. म्हणून तुम्हीं वेगळे होतात दादा.