Tuesday, 19 July 2011

बकूळा

हिवाळ्याचे दिवस होते ते...
दिवसभर हवा थंड असायची...
थंडीतल्या त्या संद्याकाळचे सौंदर्य तरी किती वर्णावे...
थोड धुक, थोडा प्रकाश, हवेमध्ये कसलातरी गंध मिसळला असावा असं वाटायचं...
तो रस्ता तसा निर्मनुष्य ...खूप कमी लोक दिसायची आजूबाजूला. 
टेकडीवरच्या मंदिरासाठी इकडून पण एक पायवाट होती,
त्यामुळे अधूनमधून एखादी आजी किंवा आजोबा छान काठी टेकवत तिकडे जाताना दिसायचे...


बाजूला उतारावर असलेला पाण्याचा तो नागमोडी ओढा... 
त्यामुळे पश्चिमेकडून येणाऱ्या वाऱ्यामध्ये एक वेगळाच गंध असयायचा...
पाऊस पडून गेल्यावर मातीचा गंध यावा तसा...!
समोर नेहमी बंद असलेल ते दगडी घर...आणि झाडांमध्ये वेढलेलं त्याच ते कौलारू छप्पर...
एखाद्या सुंदर निसर्ग चित्रात असाव तसं...
नेहमी बंद असूनही या घराच्या आवारातील झाडं नेहमी फुललेली दिसत...
कुणास ठाऊक, कोण - कधी या झाडांना पाणी टाकत...


ह्या घराच्या बरोबर समोर, अगदी काही पावलांच्या अंतरावर पूर्वेला असलेले,
ते बकुळेचे सुंदर झाड आणि त्याखालचा तो लाकडी 'बेचं'...
बकुळेच्या झाडाची सावली त्या बेंच वर नेहमी पडलेली असायची...
खाली पडलेला बकुळ फुलांचा तो पांढरा सडा बघून, जमिनीवर जणू बर्फ पांघरल्याचा भास व्हावा...!

जवळजवळ दररोज संद्याकाळी तू तिथे त्या बेचं जवळ उभी असायचीस...
मी दुरूनच तुला बघायचो...वाटायचं, ती बकुळेची फुल जास्त सुंदर कि तू...?
पांढरा शुभ्र चुडीदार नी त्यावर बकुळ फुलांची डिजाइन असलेला दुपट्टा...
वाऱ्यासोबत उडणारे केसं...कपाळावर येणारी बट आणि ती सावरण्यासाठी चाललेले तुझे प्रयत्न...मी दुरूनच बघायचो...वाटायचं छान कविता करावी तुझ्यावर...
पण मग शब्द हि निषब्ध व्हायचे...!
काय बोलावे हे देखील कळायचे नाही फक्त दुरून तुला बघत रहाव असं वाटायचं...


तुझं आणि त्या बकुळ फुलाचं नक्की काहीतरी नांत असाव...
किती एकरूप वाटायचेत  तुम्ही...
नदीच्या पाण्यावर चंद्राच प्रतिबिंब पडाव नां, तसं...
तू तिथ फक्त काही क्षणच असायचीस आणि मग कधी दिसेनासे व्हायची ते हि नाही कळायचं
कधी बकुळ फुलांचा पांढरा, कधी आकाशा सारखा निळा, कधी गुलाबी तर कधी मोरपंखी...
प्रत्येक रंगात तू वेगळी दिसायचीस...
खुपदा वाटायचं तुझ्याजवळ याव, तुझ्याशी बोलाव, तुझ हसण जवळून न्याहाळाव...
पण मग भीती वाटायची...वाटायचं कि, असे विचारल्यावर तू इथ येणंच बंद केलस तर...
नको नको...तुझ दुरून होणार दर्शन हि टळेल...
नकोच, त्यापेक्षा तुला लांबून बघन जास्त चांगल...

तू बसायची त्या बकुळेच्या झाडापासून उत्तरेला जवळच एक छोटीशी टेकडी होती...
छे... टेकडी कसली ती साधी जमीनच होती पण जरा उंचवटा असलेली...
मुळात तो सर्व भाग, असाच उंच-सकल होता...
त्या उंचवट्यावर डाव्या बाजूला, गुलमोहराच्या झाडाखाली लाल रंगाची पत्र पेटी होती...
त्या पेटी आडूनच मी तुला बघायाचो नेहमी...तुझ्या नकळत... चोरून...!

 
मला नेहमी प्रश्न पडायचा तू कोठून येतेस...का येतेस, कुणाची वाट बघतेस...
तुझ नाव काय, तुझ घर आहे तरी कोठे...
पण तुला माहीतही नसेल कि मी पहिल्यांदा तुला पाहिलं नां त्यावेळीच तुझं नामकरण केल...
'बकूळा'... अगदी बरोबर शोभत ते तुला...नाही...!

तू इथे कुणाची तरी वाट बघतेस कि नुसतच फिरायला म्हणून येतेस...
पण फिरायला येत असतीस तर तुझ्या सोबत कुणीतरी असत,
आणि तू तर नेहमी एकटीच दिसतेस... 
नाहीतर, कुणाची तरी वाट बघत असावीस पण मग तूला घ्यायायला कधीच कुणी का येत नाही...
की मग रागाच्या भरात तू घरातून इकडे येते जरावेळ मोकळा श्वास घ्यायला...
छे... छे... पण रोज रोज राग येण कस शक्य आहे...!
पण अश्यक्य ही नाही ना...
म्हणजे, तुझे घरी हाल होतात तर...!
तुझ्या घरचे खूप वाईट आहेत, आणि तुझी सावत्र आई तुला नेहमी टाकून बोलते...
खरय ना...
छे छे... काहीतरीच विचार करतो मी...
तुझ्या प्रसन्न चेहऱ्याकडे पाहून वाटत नाही कि तू दुखी असशील म्हणून...
तुझा चेहरा कसा नेहमी टवटवीत दिसतो...!

पण...पण... ह्या हसऱ्या चेहऱ्यामागे दु:ख दडले नसेल कशावरून...?
नाही नाही...तू जरा उदास दिसतेस पण दुखी नाही...
मग असं असेल कि तुला या ठिकाणी येऊन जूण काहीतरी आठवत असाव...
आठवणी ज्या तुला खूप प्रिय असाव्यात...
पण, कुणाच्या आठवणी असाव्यात त्या...तुझ्या वडिलांच्या, आईच्या की प्रियकर...

नाही...तुला प्रियकर कसा असू शेकेल...किती निरागस वाटेस तू...!
पण मग प्रियकर नसेल कशावरून, आणि प्रेमात निरागसता नसते का...?
पण तो तुला असा एकटीला का येऊ देतो इकडे...तो स्वतः का नाही येत तुज्या सोबत...
हं... तू त्याला सांगितल नसशील कदाचित...!
पण, तरीही त्याला महिती करून घ्यावीशी नाही वाटली....कि तू रोज कुठे जातेस म्हणून...

नाही नाही...तुला कुणी प्रियकर नसावाच मुळी...!
पण तरी प्रश्न अनुत्तीरंच राहतो ना...की तू का येतेस येथे...?
कारण काहीही असो, मला तुझ इकडे येण खूप आवडत...



"अरे अरे...पण झालं काय...?"
"अहो साहेब, झालं काय झालं...किती वेळ तुम्ही असे एकाच 'पैन्तिंग' कडे पाहत उभे राहिलात...ग्यालरी बंद करायची वेळ झाली की आता...उद्या या कि...मंग बघत राहा हे चित्र परत..."
"आयला, काय माणस असतात राव, तासभर एकाच जागेवर उभे राहून एकच चित्र बघत असतात... काय आहे काय या चित्रात....!"

     



Thursday, 14 July 2011

नेहमीप्रमाणे...!!

नेमीच येतो पाऊस...! या उक्क्ती प्रमाणे नेहमीच होतात मुंबईत ब्लास्ट...असं म्हणायला कुणाचीच हरकत नसावी...
खर तर या वेळी थोडं लेटच झाल म्हणायचं...पाउने तीन वर्ष म्हणजे जरा जास्तच होतात नाही...!

काल संद्याकाळी जेंव्हा बातमी समजली तेंव्हा ऑफिसातच होतो.
नेहमी प्रमाणे सर्वीकडे टीव्ही चालू होते.
प्रत्येक जन आपल्या आप्तेष्टांना फोन करून समाधान करून घेत होता...
आणि हे सर्व फक्त काही मिनिटच...!
त्यानंतर सर्व पूर्ववत, जो तो परत आपापल्या कामात.
वास्तविक एखाद्या न्यूज च्यानल च्या ऑफिसात कसे धावपळीचे वातावरण असायला हवे... पण काल तसलं काहीही नव्हत.
मला वाटत, भारत पाक सामना किंवा वल्ड कप क्रिकेटच्या वेळी जास्त धावपळ असते आमच्या ऑफिसात...!
सर्वीकडे अगदी शांतता...जस काही आता सर्वांनाच सवय झाली आहे अश्या बातमीची...

कुणालाच घरी जायची घाई नाही कि चेहऱ्यावर कसलीही भीती नाही...
सगळीकडे एकदम थंड...!
कसलाच संताप नाही.
कुणी, केंव्हा किंवा कसे ब्लास्ट घडवले असतील अशी कुठलीही चर्चा नाही...
इंडिअन मुजाहिदीन आहे कि लष्कर ऐ तोयबा...कुणालाही काहीही घेण नाही...
नाहीतरी आता ही नाव म्हणजे नेहमीचीच झाली आहेत आपल्या सर्वाना.
जसे हनुमान व्यांयाम शाळा, रोटरी क्लब किंवा ललित कला मंच, तस लष्कर ऐ तोयबा...!

काल तसा पाऊसही खूप पडत होता मुंबईत...
रात्री घराकडे निघालो तर रस्ते देखील नेहमी सारखे...वाहनांनी भरलेले.
ट्राफिक पोलिसचा चेहरा जरा  कातावलेला दिसला, कदाचित आता रात्र रस्त्यावर उभ्यानेच काढावी लागेल म्हणून असेल...
एक हा बदल सोडला तर बाहेर सर्व नॉर्मल...  

घरी जाऊन परत न्युज बघण्याची अजिबात इच्छा न्हवती.
तेंव्हा आपली नेहमीची डेली सोप...
मुंबई बाहेरील नातेवाईकांचे सारखे फोन येत होते, आम्ही ठीक आहोत का विचारण्यासाठी...
काय बोलाव कळत नव्हत.
काय सांगणार त्यांना कि आम्हाला याची सवय झाली आहे म्हणून...
कारण खरंच, काही म्हणजे काहीच वाटत न्हवत...
क्षणभर वाटल कि आपण माणूस आहोत कि नाही...
कसला संताप नाही कि हळहळ नाही...भावना बधीर झाल्या प्रमाणे...
एरवी रस्त्यावर रिक्षाने जरा कट मारला तरी ओठांवर शिवी येते, पण काल कुणाविषयी काहीही वाटत न्हवते...

आज सकाळी पेपर मध्ये नेहमीप्रमाणे मुंबई हादरली वैगरे बातम्या...
वाचायचा मुडच होत नाहीये...
सकाळी रस्त्यांवर पुन्हा ट्राफिक...शाळा, हॉस्पिटल्स, ऑफिस सर्व चालू...
आता बरेच लोक याला 'मुंबई स्पिरीट' वैगरे म्हणतील नेहमीप्रमाणे...
मोबाइल वर मेसेजेस येतायत, शिट टेररीझम किंवा शेम ओंन...इत्यादी,
पण ते वाचून संताप होण्याऐवजी उलट हसू येतंय...!
काय करू आता आमच्या भावना, संवेदना बधीर झाल्यात...नेहमीप्रमाणे...!!  

Monday, 11 July 2011

प्रारब्ध रेषा

परवा साधनाताई गेल्या, ३ वर्षापूर्वी बाबा आमटे गेले तश्या.....
काही लोकांना आपण कधीच भेटलेलो नसतो त्यांच्याशी कधी बोललो हि नसतो, पण मग त्याचं असं अचानक जाण जीवाला चटका लावून जात.
बाबा आमटे आणि साधनाताई यांच्या विषयी शाळेत असल्यापासून ऐकायला मिळायचं...
तेंव्हा वाटायचं कि आपण देखील असं इतरांसाठी काहीतरी करायला हव...
इतरांच जगण सुदंर बनवायला हवं...

पण मोठ झाल्यावर कळल कि, किती कठीण असत दुसऱ्यासाठी आपलं आयुष्य वाहून घेण...स्वतःच्या स्वप्नांचा, अपेक्षाचां त्याग करून निस्वार्थी जगण...


आपण आपल्या तळहातावरच्या 'रेषा' बघतो असतो,
स्वतःच भविष्य जाणून घेण्यसाठी या रेषांचा अर्थ ही लावतो असतो...
आणि मग त्या आहेत तसे आणि त्यां प्रमाणेच जगत असतो...

पण बाबा किंवा साधनाताई यांच्यासारखी लोक आपल्या रेषा स्वतः लिहित असतात...!


रेषा प्रारब्धाच्या,
समृद्ध जाणिवानी जगण्याच्या

रेषा संघर्षाच्या,
आड वाटेवरती भेटलेल्या निश्चयाच्या

रेषा म्हणजे गुंतागुंत,
रेषा म्हणजे आरंभ,

प्रकाश्याच्या सावली आड डोकावणाऱ्या, रेषा
क्षितिजा पलीकडे झेपावणाऱ्या, रेषा

अनुभवांनी समृद्ध झालेल्या, रेषा
स्वतःचा प्रारब्ध स्वतः घडवणाऱ्या रेषा