बगळा
बऱ्याचदा नकळत आपल्याकडून असं काहीतरी घडतं की ते आपल्याला स्वतःलाच पटलेले नसतं, पण अनावधानाने घडतात काही गोष्टी. सुधारायचं, म्हटलं तरी वेळ निघून गेलेली असते. वेळ जातो तसे ते आपणही विसरतो. पण कधीतरी आठवण आलीच तर मग मनात एक ' गिल्ट ' तयार होतो. प्रत्येक चुकणाऱ्या माणसाकडून अधून-मधून असे
' गिल्ट ' तयार होत असतात. संधी मिळाली तसे हे गिल्ट सुधारत पुढे जाणे म्हणजे जीवन!
परवा अशाच एका गिल्ट मधून मी बाहेर पडलो, त्याचा हा अनुभव...
' बगळा ', या प्रसाद कुमठेकरांच्या कादंबरी विषयी आताशा बरच छापून आलंय. जवळजवळ सर्वच वृत्तपत्रांनी त्याची दखल घेतली आहे. जाणत्या वाचकांना या पुस्तकाची ओळख झाली आहे. समीक्षकांनी त्यावर लिहिलंय. अजून ती कादंबरी जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचावी अशी एक मित्र म्हणून नव्हे तर वाचक म्हणून मनापासून इच्छा आहे.
प्रसाद, खरं तर माझा कॉलेजचा सिनियर, जो कॉलेज संपल्यानंतर भेटला. थेट मुंबईत. म्हणजे कॉलेज पुण्यात, पण मी गेलो त्यावेळी तो पास आऊट होऊन बाहेर पडलेला. २००५ ते ०७ या वर्षात आम्ही दोन-तीन वेळा भेटलेलो. त्यावेळी तो रेडिओ, टी व्ही साठी लिहीत होता, प्रोमो दिग्दर्शन करत होता. नंतर मी ही त्याच मार्गाला लागलो. ऑफिस वेगवेगळी असल्यामुळे आमची खास अशी भेट झाली नाही. पण तो मला पहिल्या भेटीतच आवडला होता. सबब, छोट्या गावातून शिक्षणाच्या माहेर घरी म्हणजे पुणे विद्यापीठात आणि कॉस्मोपोलिटन मुंबईत येऊनही त्यांनी आपली मराठवाडी सोडली नव्हती आणि मी ही आपला पुणेरी न होता खान्देशीच राहिलो होतो!
नंतर खूप वर्षांनी म्हणजे २०१५ मध्ये झी टी व्ही ला असताना श्रीनिवास गड्डंम या प्रोमो दिग्दर्शक मित्राने तो करीत असलेल्या सिनेमाचे रीडिंग ऐकण्यासाठी आपल्या घरी बोलावले. त्यावेळी आम्ही साधारण सहा-सात जण होतो. तिथं पोहचल्यावर सुखद धक्का बसला, सिनेमाचा लेखक प्रसाद होता. प्रसाद स्वतःच न्यारेशन देणार होता. खूप वर्षांनी हा ' शहरातील गाववाला ', बघून आनंद झाला.
रात्र वाढू लागली तशी गोष्ट पुढे जात होती. ग्रामीण मराठी घरातील अनेक संदर्भ त्यात होते. इतर अमराठी मित्रांना ते संदर्भ समजून सांगायला मी देखील प्रसादला थोडीफार मदत करत होतो. गोष्ट मस्तच होती. पण मला खूप प्रश्न पडले होते. त्यात सर्वात आघाडीवरचा प्रश्न होता, सिनेमाच्या व्यावसायिक गणिताचा.
कथा अत्यंत निरागस होती आणि प्रसादनी तितक्याच ताकदीने आणि साधेपणाने मांडली होती. पण त्या काळात आमच्यापैकी बहुतेकांच्या डोळ्यांवर जणू टीव्ही मध्ये अनेक वर्ष काम करून तिथल्या टीआरपीची आणि व्यावसायिक गणितांची झुल चढली होती. त्यामुळे ती निरागस कथा माझ्या पर्यंत पोहोचूनही खोलवर मुरली नव्हती, भिडली नव्हती. किंबहुना माझ्या वर झालेल्या टी व्ही च्या गल्लाभरू संस्कारांमुळे मी तिच्या पर्यंत पोहचू शकत नव्हतो.
" अमुक मिनिटात पंच, तमुक मिनिटात इमोशन्स " या फॉर्मुल्यात मी अडकलो होतो आणि ' बगळा ', कुठल्याही फॉर्मुल्यात बसणारी नव्हती!
मी प्रश्न विचारत राहिलो. प्रसाद आणि श्रीनिवास उत्तर देत राहिले. घरी निघतांना मला जाणवलं मी उत्साहाच्या भरात ' अती ' विचारलं की काय? पण त्या दोघांनी मात्र मला तसं जाणवू दिलं नव्हतं. तरीही, मला उगीचच असं काहीतरी वाटत होतं. वर म्हटल्या प्रमाणे हा एक गिल्ट मला चिकटला होता.
त्यानंतर, कदाचित निर्मात्या अभावी त्या सिनेमाचे काम राहिले आणि प्रसादनी कथेला पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करण्याचे ठरवले. याविषयी मला अजिबात कल्पना नव्हती. दीड - दोन वर्षांनी मी सरळ पुस्तक प्रकाशनालाच गेलो. दादरच्या छबिलदास शाळेत एका छोटेखानी कार्यक्रमात पुस्तकाचे अनावरण झाले. कार्यक्रमात जयंत पवार ' बगळा ' विषयी भरभरून बोलले. मी आणि माझा गिल्ट, कोपऱ्यात बसून साऱ्या मान्यवरांचे बोलणे लक्षपूर्वक एकूण घेत होतो.
पुढे माझ्या चित्रपटाच्या कामात व्यस्त झालो. पुस्तक वाचायचं राहिलं होतं.
विशालच्या ' लपाछापी ' च्या प्रीमियरला प्रसाद पुन्हा भेटला. पण त्यावेळी तो दुसऱ्या सिनेमाच्या प्रयत्नात होता. मग आम्ही फक्त एकमेकांच्या सिनेमाच्या प्रॉडक्शन विषयी बोलत राहिलो.
' बगळा ' माझ्या पासून अजूनही दूरच होती. मध्ये दादरच्या आणि पार्ल्याच्या मॅजेस्टिक मध्ये चक्कर झाले पण बगळा उपलब्ध नव्हती. फायनली गेल्या आठवड्यात ऑनलाईन उपलब्ध झाली. आलेल्या पार्सलला दोन दिवस स्पर्श न करण्याचा क्वारनटाईन नियम मोडून घाईघाईत बगळा वाचून काढली.
आणि खरं सांगतो, माझा गिल्ट कमी होण्याऐवजी आणखी वाढत गेला. इतक्या उच्च दर्जाची कलाकृती त्यावेळी आपल्या आत पोहचू शकली नाही, या विषयीचे ते फ्रस्ट्रेशन असावे.
लिखाणातील इतका साधेपणा, अत्यंत नवीन धाटणीची मांडणी. खास उदगीर शैलीतील बोली आणि मुख्य म्हणजे आपण ज्या प्रोटगोनिस्ट ची गोष्ट वाचत आहोत तो कुठेही बोलत नाहीये. त्याला सोडून आख्खे जग त्याच्या विषयी बोलतय. इतरांच्या या बोलण्यातून बगळा चा नायक, चिंतामण सरदेशमुख आपल्याला उलगडत जातो. ही लेखन शैली अत्यंत कल्पक आहे.
शेवटी प्रसादशी तासभर त्याच्या बगळ्या बद्दल, त्यातील पात्रांबद्दल, प्रसंगांबद्दल भडभडून बोलून घेतलं आणि हलका झालो.
मला अजूनही कळत नाहीये, मी हे सर्व का लिहितोय? खरंतर मी पुस्तकाविषयी लिहायला हवं. लिहिण्यासारखं खूप आहे. पण मी हा माझा अत्यंत वैयक्तिक अनुभव सांगत बसलोय.
पण खरं सांगू का, यात माझा स्वार्थ आहे. या कथेत ' चिंत्या ' ला बोल लावणाऱ्या अनेक खलनायकापैकी मी ही एक नव्हतो ना? हा प्रश्न माझं मन खात होता.
या पुस्तकाच्या वाचनाने माझा पाच वर्षाचा गिल्ट धुवून निघालाय. आता सर्व निरभ्र झालंय. ' बगळा ' समजून घेण्यासाठी तुम्हाला तुमचं बाह्य आवरण फाडून टाकावं लागेल. वय वाढतं तशी निरागसता हरवते म्हणतात. बालपणीची निरागसता टिकवून ठेवणं फार कठीण. ती तशीच आठवून, कागदावर मांडणं तर त्याहून कठीण. प्रसादनी मात्र आपल्या लिखाणात ती सहजता, निरागसता कायम ठेवली आहे, यातच त्याच्या लेखन शैलीचे सार आले.
कुणी कितीही दगड, धोंडा म्हटलं तरी तुमच्या जवळ असणाऱ्या हिऱ्याला त्यानी काही फरक पडत नाही. कितीही अंधार असला तरी त्याचा प्रकाश कोण आणि किती वेळ आडवू शकणार...
प्रसाद, तुझ्या या पुस्तका नंतर तुझ्याकडून खूप अपेक्षा वाढल्यात अश्या पुणेरी छाप घोषणांना तू बळी न पडता, बिन महत्वाच्या अपेक्षांच ओझं न बाळगता अशाच साधेपणाने लिहीत राहावे, यासाठी तुला शुभेच्छा.
(मी समीक्षक वैगरे नाही. त्यामुळे कथानक काय, पात्र कशी आहेत, काळ कुठला या विषयी इथं फार लिहीत नाही. अनेकांनी त्यावर भरपूर लिहिलंय.
त्यातील दोघांची लिंक इथ देतोय. पुस्तकाविषयी अधिक माहिती मिळविण्यासाठी हे लेख महत्वपूर्ण ठरतील. शेवटी इतकंच म्हणेल, प्रत्येकानी ही कादंबरी आवर्जून वाचावी अशीच आहे.)
https://www.aksharnama.com/client/article_detail/1077
And
(' बगळा ', ही कादंबरी पुढील लिंक वर ऑनलाईन ऑर्डर करू शकता.)
https://www.bookganga.com/eBooks/Books/Details/4790380271385541066